Ravindra Chavan
मुंबई: माहिममध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. "काल आलेला पोरगा बोलतो आणि आपण आंदोलन करतो, हे चुकीचं आहे. युवकांना शिक्षीत करायचं आहे, गुंड म्हणून तयार करायचं नाही," असे खडेबोल मुंबई कार्यकरणी बैठकीत चव्हाण यांनी युवा मोर्चाला सुनावले आहेत.
पुण्यातील शासकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ असलेल्या पंतप्रधान मोदी यांचा फोटोला अमित ठाकरे यांनी सोमवारी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो फोटो हटविला होता.
या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी मुंबईत उमटले होते. एकीकडे अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, दुसरीकडे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी माहिममध्ये आंदोलन केले होते. भाजप कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाकडे जाण्याचा पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. आंदोलनानंतर भाजयुमो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाकडे जाण्याचा आग्रह धरला केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रोखले. दरम्यान, माहिम परिसरात भाजप आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान, भाजयुमोचे कार्यकर्ते शिवतीर्थावर येणार असल्याची माहिती पसरताच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर जमले होते.
भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करायचे असल्यास त्यांनी आझाद मैदानात करावे; शिवतीर्थावर आल्यास उत्तर दिले जाईल, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावले. तर, आम्ही शांतपणे आंदोलन करण्यासाठी गेलो होतो, मात्र मनसेच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. काचेच्या बॉटल्स फेकून हिंसक वातावरण तयार केले, असा आरोप महाडिक यांनी केला.