महाराष्ट्र काँग्रेस विचाराचे राज्य; लोकसभा जिंकली, आता विधानसभेकडे लक्ष्य : चेन्नीथला

महाराष्ट्र काँग्रेस विचाराचे राज्य; लोकसभा जिंकली, आता विधानसभेकडे लक्ष्य : चेन्नीथला

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे, एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे, आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस मुख्यालय, टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडली. यावेळी सर्व नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, आघाडीचे राजकारण सोपे नसते पण सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन महाविकास आघाडी मजबूत केली व निवडणुकीला सामोरे गेलो. भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी ऐक्य केले आणि जनतेनेही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात १८ जाहीर सभा घेतल्या, मंगळसुत्र, हिंदू-मुस्लीम, पाकिस्तान हे मुद्दे पुढे करत विभाजनकारी राजकारण केले पण जनता यावेळी मोदींच्या अपप्रचाराला बळ पडली नाही.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलून टाकले व जनतेत मोठा आत्मविश्वास निर्माण केला. देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याच्या लढाईत तानाशाही सरकार विरोधात ते खंबीरपणे लढले व जनताही त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राहुल गांधी यांच्या गॅरंटीवर जनतेने विश्वास ठेवला. कार्यकर्त्यांची मेहनत व मजबूत संघटन, मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे काँग्रेस पक्षाने मोठा विजय संपादित केला आहे. काँग्रेसच्या या विजयात सर्व जाती धर्मांच्या लोकांचे समर्थन आहे. काँग्रेस पक्षावर जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे नाना पटोले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राज्यसभा खासदार मुकूल वासनिक यावेळी म्हणाले की, काँग्रेस पक्षाची २०१९ च्या निवडणुकीत चांगली कामगिरी झाली नव्हती. २६ जागा लढवून १ जागा जिंकू शकलो पण यावेळी मात्र १७ जागा लढवल्या व १४ जागेवर घवघवीत यश संपादन केले आहे. हे यश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे शक्य झाले आहे. लोकसभेच्या विजयात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे मार्गदर्शन व योगदान अत्यंत महत्वाचे आहे. असे सांगत मुकूल वासनिक यांनी या वरिष्ठ नेत्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला व टाळ्याच्या गजरात तो एकमताने संमत करण्यात आला.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, रजनीताई पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, के. सी. पाडवी, अमित देशमुख, अस्लम शेख, सुनिल केदार, डॉ. विश्वजित कदम, AICC चे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, बी. एम. संदीप, रामकिशन ओझा, आ. अभिजीत वंजारी, आ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, खजिनदार डॉ. अमरजित सिंह मनहास, मुजफ्फर हुसेन, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, राजेश शर्मा, ब्रीज दत्त सोशल मीडिया विभागाचे विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी माजी प्रदेशाध्यक्ष स्व. प्रतापराव भोसले व आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news