

Mumbai news
मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर या कुटुंबाची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती. त्यानंतर त्यांनी कलिंगडाचे सेवन केले. मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे विषबाधा नेमकी कोणत्या अन्नपदार्थामुळे झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), नसरीन डोकाडिया (वय ३५), आयशा (वय १६) आणि झैनब (वय १३) अशी मृत व्यक्तिंची नावे आहेत. कुटुंबातील चारही जणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विषबाधा बिर्याणीमुळे झाली की कलिंगडामुळे, याबाबत सध्या विविध शक्यता तपासल्या जात असून, संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू आहे.