

Mumbai NEET Student protest Police Viral Video
मुंबई: नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची धग देशभर पसरत आहे. मुंबईतही विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेत पुन्हा आंदोलनासाठी आल्यास खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी मुंबई पोलिसांकडून दिली जात आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई काँग्रेसने 'एक्स'वर यासंदर्भात पोस्ट करत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, जर व्हायरल व्हिडीओतील दावा खरा असेल, तर ही केवळ विद्यार्थ्यांना घाबरवण्याची बाब नसून लोकशाहीतील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर थेट हल्ला आहे. "स्वतःचा आवाज उठवणे हा गुन्हा नाही. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे धमक्यांमधून नव्हे, तर जबाबदारीने आणि उत्तरदायित्वाने दिली पाहिजेत," असे काँग्रेसने म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या गाडीमध्ये एक पोलिस हवालदार विद्यार्थ्यांना "पुन्हा आंदोलनात दिसलासा तर ५० ग्रॅम पावडर खिशात टाकेल, मग संपूर्ण आयुष्य वाया जाईल, जामीनही मिळणार नाही," अशी धमकी देत आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओतील दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच या आरोपांवर मुंबई पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
दिल्लीत आंदोलनादरम्यान पोलिसांकडून सुरू असलेल्या अमानुष वर्तणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आत्ताच एकाची पोस्ट वाचली 'परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे. जे स्वतःचा जीव वाचवू शकत नाहीत, ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार? सुन्न झालो! आपण माणसे उरलो नाही, 'झॉम्बी' झालो आहोत."
"हा कोणता उन्माद आपल्या सर्वांच्या डोक्यात भरला आहे? त्या तरुण, कोवळ्या मुलामुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असेल, किंवा 'असंच पाहिजे या मुलांना' असा आनंद त्यांना होत असेल, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडला आहे. प्रत्येक गोष्ट संवादाने १०० टक्के सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती. तरुण, कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेने बरसलेल्या लाठ्या खूप व्यथित करतात. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये. मुलांचे म्हणणे आणि त्यांच्या समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे," असे चौघुले यांनी म्हटले आहे.