

Jarange advises protesters not to leave Jantar Mantar
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही ही जागा सोडली, तर हे आंदोलन सरकार मोडून काढेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला. वेळ पडल्यास महाराष्ट्रातील सगळे मराठा बांधव आंदोलकांच्या मदतीसाठी दिल्लीत येतील, असेही जरांगे पाटील म्हणाले. बुधवारी दिल्ली दौऱ्यात जरांगे यांनी जंतर-मंतरवर जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह आंदोलकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजपला धारेवर दिले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येकवेळी गोरगरिबांच्या मुलांवर अन्याय करते. यापुढे सरकारने विद्यार्थ्यांवर हात उगारल्यास सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातफिरणे कठीण होईल आणि यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचा संदर्भ देत जरांगे म्हणाले, तिकडेही गोरगरीब मुले, महिला, वृद्धांवर प्राणघातक हल्ला केला होता. आमच्यावर गोळ्या झाडल्या; पण आम्ही हटलो नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनाची जागा सोडू नये. संपूर्ण देश तमच्यासोबत आहे.
माझी हिंदी चांगली नाही
बोलायला उभे राहिल्यावर मनोज जरांगे यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. अभिजित दीपके त्याचे हिंदीत भाषांतर करीत होते. काही आंदोलक व उपस्थितांनी त्यांना हिंदीतून बोलण्याचा आग्रह केला. यावर माझी हिंदी इतकी व्यवस्थित नाही. मी हिंदीत बोलायला लागलो तर तुमची हिंदी तुम्ही विसरून जाल, असे जरांगे म्हणाले. त्यामुळे जंतर-मंतरवरील वातावरण काही हलके झाले.