

राज्य सरकारने व्यावसायिक वापरासाठीचा पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठा तूर्तास स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. बाजारात सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. 1600 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता 3 हजार रुपयांना विकला जात असल्याचा आरोप आहार संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी केला आहे.
मंगळवारी नवी मुंबईत 1800 रुपयांना मिळणारा एक व्यावसायिक सिलेंडर 2500 रुपयांना एका हॉटेल व्यावसायिकाने घेतला. हाच सिलेंडर अंधेरीत 6000 रुपयांना घ्यावा लागला. नाशिकमध्ये एका सिलेंडरसाठी 3000 रुपये आणि पुण्यात 2500 रुपये मोजून व्यावसायिक सिलेंडर घेण्यात आल्याचे नवी मुंबई आणि रायगड हॉटेल ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टी यांनी पुढारीला सांगितले.
हॉटेल संख्या
मुंबई 8 ते 10 हजार
नवी मुंबई 2500
रायगड जिल्हा 500 ते 600
ठाणे 1500
मुंबई/नवी मुंबई: मध्यपुर्वेतील युद्धामुळे गॅस टंचाई उद्भवल्याने मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई म्हणेच महामुंबई प्रदेशातील लहान मोठी मिळून 15 हजारांवर हॉटेल्स चार ते पाच दिवसात बंद होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती नवी मुंबई आणि रायगड हॉटेल ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टी यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली.
सिलेंडर संपले आणि नवा सिलिंडर मिळण्याची आशाही खुंटल्याने मंगळवारी महामुंबईतील 35 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली . सिलेंडरचा साठा असलेली हॉटेल्स आणखी तीन ते चार दिवस तग धरतील. त्यानंतर ही हॉटेल्सही बंद होतील, अशी स्थिती आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पुर्ववत न झाल्यास हॉटेल व्यवसाय ठप्प पडण्याची भीती शेट्टी यांनी व्यक्त केली.
मुंबईसह नवी मुंबई, रायगड,ठाणे,कल्याण, डोंबिवलीसह उपनगरात 30 टक्के हॉटेल मध्ये पाईपलाईनने महानगर गॅसचा पुरवठा होतो. मात्र उर्वरित 60 ते 70 हॉटेल मध्ये व्यावसायिक सिलेंडरचा वापर केला जातो.
सिलेंडर बुकींग केल्यानंतर दोन दिवस सिलेंडर मिळत नाही.अनेकांनी गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे चित्र आहे. लहान हॉटेल व्यावसायिकाला दोन ते तीन सिलेंडर एका दिवसाला लागतात. मोठ्या हॉटेल व्यावसायिकाला चार ते पाच सिलेंडर लागतात. दोन दिवसापासून सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.
देशातील बहुतांशी हॉटेल्स व्यावसायिक सिलेंडर वापरतात. त्यांच्याकडे पीएनजी किंवा इलेक्ट्रीकसारखे पर्याय अत्यंत कमी आहेत. केवळ महानगरेच नव्हेत तर पुणे, लखनौ, भोपाळ, पुद्दुचेरी सारख्या शहरांनाही व्यावसायिक सिलेंडरचा तुडवडा भासू लागला आहे. सध्या केंद्र सरकारने घरगुती वापराच्या सिलेंडर्सना प्राधान्य देत हा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांना देखील हे सिलेंडर्स प्राधान्याने पुरवण्याच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. या प्राधान्य क्रमात हॉटेल शेवटच्या क्रमात असल्याने घराबाहेर खाण्यापिण्याचे वांधे होवू घातले आहेत.
एकूण स्वयंपाकाच्या गॅसपैकी 60 टक्के गॅस भारताला आयात करावा लागतो. यातील 90 टक्के गॅस होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गाने भारतात दाखल होतो. हाच मार्ग इराणने बंद केल्याने हा गॅस पुरवठा ठप्प्ा झाला आहे. दरवर्षी देशात 31 दशलक्ष टन एलपीजी ची गरज भासते. त्यातील 87 टक्के एलपीजी घरगुती वापरासाठी उपयोगात आणला जातो. उर्वरित एलपीजी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना पुरवला जातो. हाच पुरवठा खंडित झाला आहे.
विजय शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. हॉटेल उद्योग 25 टक्क्यांपर्यंत इंधन कपात सहन करू शकतो. मात्र त्यापेक्षा जास्त कपात झाल्यास व्यवसाय सुरू ठेवणे कठीण होईल. त्यामुळे, केंद्र सरकारने पेट्रोलियम मंत्रालयामार्फत तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.