

Devendra Fadnavis on Vidyanand Bapat
पुणे: गणेशोत्सवात डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या वापराला विरोध दर्शवणारे विद्यानंद बापट यांच्यावर टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात गुरुवारी हल्ला झाला. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच बापट यांच्या शुद्ध मराठीचे कौतुक करत त्यांना एक सल्लाही दिला.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "सण-उत्सवातील प्रथा किंवा पद्धती कायद्याने अचानक बंद न करता लोकांना विश्वासात घेऊन सर्व निर्णय घ्यावे लागतील. प्रचंड ध्वनीप्रदूषणापासून आपल्याला दूर जावेच लागेल. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात; परंतु हिंसाचार मात्र अजिबात होऊ नये," असे फडणवीस म्हणाले.
बापट यांना काय सल्ला दिला?
या वेळी पत्रकारांनी फडणवीस यांना बापट यांच्या शुद्ध मराठीवरून प्रश्न विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, "त्यांची मराठी सध्या ट्रेंडिंग आहे. मराठी भाषेच्या शुद्धतेचा एक नमुनाच त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतो. आता अपेक्षा एवढीच आहे की, ज्याप्रमाणे ते अत्यंत शुद्ध आणि सुंदर मराठी वापरतात, जी ऐकून आपल्याला खूप आनंद होतो; त्याचप्रमाणे विचार मांडताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही आणि ते मुद्दे सर्वसमावेशक असतील. बापट यांच्यासारखी भाषा बोलायला मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल! केवळ बापटच नाही, तर जी कोणती व्यक्ती अशी शुद्ध भाषा वापरते, तिचे बोलणे ऐकून आनंदच होतो," असेही फडणवीस .
गुरूवारी बापट एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना गणेश मंडळाच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. संतोष चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, तो प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील ध्वनी प्रदुषणावर आपले परखड मत मांडणाऱ्या विद्यानंद बापट या तरूणावर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यानंतर विद्यानंद बापट यांनी आज याबाबत प्रत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. बुद्धी प्रमाण्यावादाचे पुरस्कर्ते असलेल्या विद्यानंद बापट यांनी आजच्या पत्रकार परिषदेत तुम्ही विद्यानंद बापट यांच्यावर फोकस करू नका म्हणजेच माझ्यावर फोकस न करता माझे मुद्दे खोडून काढा. मी कोणीच नाहीये. तुम्ही माझे मुद्दे खोडून काढा असं खुलं आव्हान डीजे समर्थकांना दिलं.
विद्यानंद बापट यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ते एखादी संघटना वगैरे सुरू करणार का याबाबत देखील विचारणा झाली. त्यावेळी त्यांनी महानगरपालिकेतील घटनेनंतर सिटीझन अॅक्टिव्हजम वाढीला लागलं आहे. त्यामुळं हा लढा तसाच चालू राहील. याला संघटनात्मक स्वरूप द्यायचं हे पाईपालाईनमध्ये आहे त्यामुळं सध्या त्याबाबत काही सांगू शकत नाही असं उत्तर दिलं.