Maharashtra politics : ठाकरे गटाला धक्का : आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश | पुढारी

Maharashtra politics : ठाकरे गटाला धक्का : आमदार रवींद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे माजी आमदार रवींद्र वायकर यांनी आज ( दि.१०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी हा पक्षप्रवेश केला. यावेळी खासदार गजानन किर्तीकर यांच्यासह शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (Maharashtra politics)

शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर वायकर म्हणाले, गेली पन्नास वर्ष मी शिवसेनेत काम केलं आहे. १९७४ तील पहिली जोगेश्वरीतील दंगल झाली तेव्हापासून मी बाळासाहेबांबरोबर आहे. चार वेळा नगरसेवक, चार वेळा पँनिग कमिटी, तीन वेळा आमदार या पर्यायाने शिवसेनेचे पडेल ते काम केले आहे. कोवीडमध्ये काही कामे झाली नाहीत. आरेच्या बाबतीत बोलायचे झाले तर १७३ कोटी मला आरेतील ४५ किलोमीटर रस्त्यासाठी हवे आहेत. आरेच्या बाबतीत लोक रडत आहेत. तसेच अजूनही अनेक भागात पाण्याची व्यवस्था परिपुर्ण नाही. अशा वेळेला धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं गरजेचे असते. सत्तेत असल्यानंतर आपण असे धोरणात्मक निर्णय सोडवले तर तेथील लोकांना आपण न्याय देऊ शकतो. तुम्ही ती कामे केली पाहिजे, यासाठी लोक निवडून देतात. त्यामुळे धोरणात्मक निर्णय बदलून सत्तेतून लोकांची कामे करण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे आमदार वायकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार गजानन किर्तीकर म्हणाले, एक कर्तव्यदक्ष आमदार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमच्याबरोबर आला आहे. विधानसभा असो महानगरपालिका निवडणूक असो किंवा लोकसभा असो त्यासाठी फार मोठी अशी ताकद रवींद्र वायकर यांच्या येण्याने पक्षाला मिळाली आहे. (Maharashtra politics)

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वायकर यांनी आज बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षातर्फे स्वागत आहे. गेली ४० वर्षे त्यांनी बाळासाहेबांबरोबर शिवसेनेत काम केले आहे. त्यांनी आपल्या मंतदारसंघातील प्रश्न मला बैठकीदरम्यान सांगितले.  पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि राज्यात युतीच्या माध्यमातून जे निर्णय दीड वर्षात घेतले. याचा सकारात्मक परिणाम वायकर यांच्यावर झाला आहे. हे सरकार काम करणारं आहे, हा विश्वास ठेवून ते आज आमच्याबरोबर आले आहेत. शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलं आहे. त्यांना न्याय देणं अपेक्षित असतं. लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणे गरजेचं असतं. आपल्या मतदारसंघातील आपली कामे झाली पाहिजे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. (Maharashtra politics)

हेही वाचा :

Back to top button