Maratha Reservation : भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करताहेत : संभाजीराजे छत्रपती | पुढारी

Maratha Reservation : भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करताहेत : संभाजीराजे छत्रपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा आज (दि.१७) पार पडली. (OBC Reservation) यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जहरी टीका केली. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असे भूजबळ जरांगे पाटलांना उद्देशून म्हणाले. “आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे”, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी X वर पोस्ट पोस्ट करत “छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत” असा आरोप केला आहे. (Maratha Reservation)

भांडणं लावण्याचं पाप…

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.” असे संभाजीराजेंनी भूजबळांना उद्देशून म्हटले आहे.

Maratha Reservation : काय म्हणाले होते भुजबळ?

जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत छगन भूजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ म्हणाले, ‘शरद पवारांना ओबीसींना आरक्षण दिलं. आता मराठा समाजाचे नवे देव झालेत. दगडाला शेंदूर फासून देव कुठे झाला? यावेळी त्यांनी नाव न घेता जरांगे-पाटलांवर निशाणा साधला. कुणाचं खाताय, कुणाचं खाताय? की तुझं खातोय का? तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी भाकरी तोडत नाही. असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. आमची लेकरं बाळ आमची लेकरंबाळ ही दोनचं वाक्य येतात. का आमची लेकंर बाळं नाहीत का? आजवर मराठा नेत्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. अरे मराठा तरुणांनो, याच्या मागे कुठे लागलात?’ ओबासी आरक्षाणाचा आदेश केंद्राने दिला, शरद पवार यांनी तो मान्य केला. मराठा समाज अवैधपणे ओबीसी आरक्षणात शिरतोय. आरक्षण म्हणजे काय हे तर आधी समजून घ्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही.

पुढे बोलत असताना ते म्हणाले की, “गावागावातले गावबंदीचे फलक पोलिसांनी हटवावे. आमदार, मंत्र्यांना गावबंदी, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर दिलाय?जशास तसं उत्तर द्यावं लागेल. हम आह भरते है तो बदनाम हो जाते है… अशी शायरी करत त्यांनी जातनिहाय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे. समाज समजातलं वितुष्ट मी कधी लावलं? दलित, मुस्लिम सगळे एकवटू, दादागिरी बंद करू, शांतपणाने उत्तर द्यायचं असे म्हणत त्यांनी ‘मुश्किलों से भागना आसान होता है…’ ही शायरी सादर केली. ओबीसी आता गप्प बसणार नाही, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button