सांगली : १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करा : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

सांगली : १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करा : मनोज जरांगे-पाटील

वीटा ; पुढारी वृत्‍तसेवा ओबीसींना ज्या निकषांवर आरक्षण दिले, त्याच निकषांवर आम्हालापण आरक्षण द्या अशी मागणी करत १८०५ ते १९६७ आणि १९६७ ते २०२३ या काळातील प्रत्येक कागद तपासायचं काम सुरू आहे. या कामांत सरकारला मदत करा, तसेच १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करा असे आवाहन मनोज जरांगे- पाटील यांनी केले.

मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांची सांगली जिल्ह्यातली पहिली सभा आज (शुक्रवार) सकाळी साडेदहा वाजता विट्यात पार पडली. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या या सभेला विटा, कडेगावसह परिसरातील हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सभेच्या ठिकाणी ८ बाय १० फुटाचे व्यासपीठ, त्यावर छत्रपती शिवरायांची मोठी मूर्ती आणि फक्त लढ म्हण, या घोषवाक्यासह मनोज जरांगे यांची ५ बाय १५ फुटी छवी असलेला फलक इतकेच काय ते होते. पुढे प्रत्येक १०० फुटांवर एक असे ५ एलइडी स्क्रीन उभारले होते. शिवाय विट्याच्या प्रत्येक चौकात लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्रत्यक्ष कार्यक्रम नऊ वाजता सुरू झाला. “कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय”,’ एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी” या घोषणांच्या जयघोषात शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याला सुरूवात केली.

” लबाड सरकार ढोंग करतंय, आरक्षण द्यायचं सॉंग करतय, “उठ मावळ्या आरक्षणाचा, करू या जय जयकार” यांसारख्या पोवाड्याच्या कवनांनी वातावरण भारून गेले होते. बरोबर साडेदहा वाजता मनोज जरांगे व्यासपीठावर आले आणि त्यांनी मुक्त संवाद सुरू केला.
ते म्हणाले, आपल्या जीवात जीव आहे, तोपर्यंत एक पाऊलही मागे हटणार नाही. आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. सत्तर वर्षापूर्वीपासून आम्ही ही मागणी करतोय. मात्र पुरावे नाहीत, म्हणून आम्हाला आरक्षण डावलण्यात आले. आमचे पुरावे बुडाखाली कोणी दडवून ठेवले? असा सवाल करीत तुम्ही एकजूटीने रहा. तुमच्यात मतभेद करण्याचा प्रयत्न होईल. त्याला बळी पडू नका. यावेळी त्यांनी २४ डिसेंबर पर्यंत आपण सरकारला वेळ दिला असल्याचा पुनरोच्चार करीत तोपर्यंत आरक्षण न मिळाल्यास पुढील दिशा समाजाला विचारून ठरवू. पण तोपर्यंत आपले आंदोलन शांततेत सुरू ठेवा. कुणीही आत्महत्या करू नका.

ते म्हणाले, मराठा समाजाने आरक्षण समजून घ्यायला वेळ लावला म्हणून आपल्यावर ही वेळ आली. आरक्षण समजून घ्या आणि समाजात जागृती करा. आता समाज एकत्र आला आहे. तुमच्यात मतभेद करण्याचे, मनभेद करण्याचे षडयंत्र रचले जाईल. त्याकडे लक्ष देऊ नका. अशांना समजून सांगा. तुमच्या स्वार्थासाठी आमच्या आरक्षणाच्या आंदोलनात फूट पाडू नका. आम्ही एकत्रीतच राहणार असल्याचे ठासून सांगा. आज विट्यात एकही दुकान उघडे नाही. हा संदेश संपूर्ण राज्यात गेला आहे. सरकारने हा इशारा समजून घेण्याची गरज आहे. घराघरातील लेकरांची वेदना घेऊन लोक इथे आले आहेत. त्यांची वेदना सरकारने समजून घेण्याची गरज आहे. एक दोन टक्क्यांसाठी पोराचं अॅडमिशन हुकतं, तेव्हा आई वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. त्यासाठी आम्हाला आरक्षण हवे आहे.

गेल्या सत्तर वर्षात केवळ पुरावे नाहीत, म्हणून आम्हाला आरक्षण डावलण्यात आले. मात्र आपले आंदोलन सुरू झाले आणि सरकारला जाग आली. मराठ्यांची एकजूट पाहून सरकारने नोंदी तपासायला सुरूवात केली. आता जिल्ह्या जिल्ह्यात लाखोंनी नोंदी सापडत आहेत. मग आता आरक्षण द्यायला काय अडचण आहे? आता जे पुरावे सापडत आहेत, ते सत्तर वर्षापूर्वी तपासले असते आणि त्याचवेळी आरक्षण दिले असते, तर ही वेळ आली नसती. आम्हाला मागे ठेवण्याचे काम कोणी केले? आम्ही काय पाप केले म्हणून आम्हाला आरक्षण दिले नाही, असा सवाल करीत अनेक समाजातील पोटजाती ओबीसीत गेल्या मग कुणबी ही मराठ्यांची पोटजात नाही काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तर वर्षे तुम्ही आम्हाला खेळवत आलात. मात्र आता आम्ही फसणार नाही. आत्तापर्यंत काय झाले माहित नाही. मात्र यापुढे आरक्षण मिळेपर्यंत एक पाऊल देखिल मागे हटणार नाही. सत्तर वर्षे सत्तेत असणारे सर्व नेते आणि पक्षांना आवाहन आहे. मराठा समाजाने तुम्हाला खूप काही दिले. आता समाजासाठी काम करण्याची वेळ आली आहे. आज आमच्या लेकरांना तुमची गरज आहे, समाजातील लोकांनी स्वतःच्या लेकरांच्या कल्याणासाठी आता मागे राहू नये असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.

हेही वाचा : 

Back to top button