Guardian Minister Maharashtra : अजितदादांचा पालकमंत्री पदासाठी ‘आजार’; पण दोनच जिल्ह्यांचे टॉनिक | पुढारी

Guardian Minister Maharashtra : अजितदादांचा पालकमंत्री पदासाठी 'आजार'; पण दोनच जिल्ह्यांचे टॉनिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. त्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या असतानाच आज १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर झाली. पालकमंत्रीपदाच्या वाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी षटकार मारत मनासारखे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवले. मात्र, त्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री पदाच्या ‘आजाराला’ पुणे आणि बीड या दोनच जिल्ह्यांचे टॉनिक मिळाले आहे. (Guardian Minister Maharashtra)

संबंधित बातम्या : 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जून महिन्यात उभी फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नऊ मंत्र्यांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. नाशिक- छगन भुजबळ, रत्नागिरी- अदिती तटकरे, बीड- धनंजय मुंडे, पुणे- अजित पवार, सातारा- दिलीप वळसे पाटील, कोल्हापूर- हसन मुश्रीफ, परभणी- संजय बनसोडे आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद अनिल पाटील यांना द्यावे, अशी मागणी अजित पवारांनी केली होती.

अखेर रखडलेल्या पालकमंत्री पदांचे वाटप आज करण्यात आले. यात १२ जिल्ह्यांपैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊपैकी सात मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या नियुक्यांमध्ये शिंदे गट आणि भाजपपेक्षा अजितदादांचे पारडे जड ठरले. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निर्माण झालेला वाद देखील सुटला आणि अपेक्षेप्रमाणे पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात पडली. (Guardian Minister Maharashtra)

शिवाय बीड जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. छगन भुजबळ व सुनील तटकरे यांची इच्छापूर्ती मात्र झालेली नाही. अनिल पाटील यांनाही जळगाव ऐवजी नंदुरबार जिल्हा देण्यात आला. तर अनेक जिल्ह्यांच्या नियुक्त्या अनिर्णित ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे अलिबागला अद्याप हात लागलेला नाही. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपली कन्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र आदिती तटकरेंना रत्नागिरीचे पालकमंत्री दिले. याचा अर्थ विस्तारानंतर भरत गोगावले यांचा अलिबागचा हट्ट पुरवला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Back to top button