मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्नी घरातील कामे करीत नाही हे काही कारण होऊ शकत नाही. आजच्या आधुनिक जगात महिलांसोबत पुरुषांनीही घरातील निम्म्या कामांचा वाटा उचलायला हवा, असे मत व्यक्त करीत मुंबई उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात पतीचे अपिल फेटाळले.
संबंधित बातम्या :
या प्रकरणातील व्यक्तीने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता. २०१८ मध्ये कुटुंब न्यायालयाने त्याचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला होता. त्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपिल केले होते. त्यांनी अपिलात युक्तिवाद केला होता की, २०१० साली लग्न झाल्यापासून पत्नी कायम फोनवर आईशी गप्पा मारत बसते व घरातील कामांना हात लावत नाही. यावर त्याच्या पत्नीने बाजू मांडली की, सायंकाळी ऑफिसमधून आल्यावर सगळी कामे आपल्यालाच करावी लागतात. माहेरच्या व्यक्तींशी फोनवर बोलल्यावर पती शिवीगाळ करतो. अनेकदा त्याने मारहाणही केली आहे.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्या. नितीन सांबरे व न्या. शर्मिला देशमुख यांनी म्हटले की, पत्नी आपल्याशी क्रूर वागते हे पतीला सिद्ध करता आले नाही. या प्रकरणातील पती, पत्नी दोघेही कमावते आहेत. त्यामुळे पत्नीनेच घरातील सारी कामे करावीत, हा पुराणमतवादी विचार आहे.
हेही वाचा :