पुढारी ऑनलाईन डेस्क : 'शासन आपल्या दारी' चे मोठमोठे कार्यक्रम करून पैसा दिखाव्याकरीता वाया घालवण्यापेक्षा या पीडित शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या दारी जरूर जावे." असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. (Jayant Patil) त्यांनी याबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप चांगला पाऊस झाला नाही. यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. या परिस्थितीवर एक्सच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, "यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात तब्बल ३७ शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. खरीपाच्या सुरुवातीला जूनमध्ये पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. नंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. निसर्गाने अवकृपा केली असताना, शासकीय पातळीवर देखील सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यात आता दुष्काळाचे भयानक सावट दिसत असल्याने नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा आहे.
'शासन आपल्या दारी'चे मोठमोठे कार्यक्रम करून पैसा दिखाव्याकरीता वाया घालवण्यापेक्षा या पीडित शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या दारी जरूर जावे." असं म्हणत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.