मालाड : जानू भोये नगरातील पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांचे घराचे स्वप्न होणार साकार | पुढारी

मालाड : जानू भोये नगरातील पहिल्या मजल्यावरील झोपडीधारकांचे घराचे स्वप्न होणार साकार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जानू भोये नगर मालाड (पूर्व) येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. या रहिवाशांना आता झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार आहे. जानू भोये नगरमधील रहिवाशांनी घरासाठी तब्बल १२ वर्षे लढा दिला. मालाड हायवे, मंत्रालय येथे धरणे आंदोलन केले अखेर रहिवाशांच्या लढ्याला यश मिळालं. आज (दि.११) रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार झाले. जानू भोये नगरमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना घर देण्यासाठी नगरसेवक आणि भाजप नेते विनोद मिश्रा यांनी अथक प्रयत्न केले.

महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने ६ सप्टेंबर २०१९ रोजी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना घर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानंतर सरकार बदललं पण आता पुन्हा नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. गृहनिर्माण खाते देखील फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी पुन्हा याबाबत माहिती घेतली. म्हाडाच्या मुख्य कार्यालयात २८ सप्टेंबर २०२२ रोजी बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत सविस्तर चर्चा आणि सादरीकरण देखील झाले होते. त्यावेळी फडणवीस यांनी झोपडपट्टी क्षेत्रात असणाऱ्या जुन्या चाळातील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंबाबत सहानभूतीपूर्वक तसेच सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. या बैठकिनंतर हा प्रस्ताव मंत्रालयातच पडून होता. त्यासंदर्भात माहिती घेवून नगरसेवक मिश्रा यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी सकारात्मक निर्णय देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

आज जानू भोये नगर मालाड (पूर्व) येथील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांना झो.पु.प्रा.योजनेद्वारे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घर मिळणार असल्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्याचे कळविण्यात आले. “फडणवीस यांनी घेतलेल्या त्वरीत निर्णयामुळे जानू भोये नगर येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. याचा आनंद तर आहेच, त्याचबरोबर या निर्णयाचा फायदा मुंबईमधील अनेक झोपडीधारकांना भविष्यात होणार आहे. राज्य सरकारने निर्णय घेताना दाखवलेली तत्पर्ता उल्लेखनीय आहे. याबद्दल मी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानतो” असे मत नगरसेवक मिश्रा यांनी व्यक्त केले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मिहीर कोटेचा यांनी मदत केली याबद्दल त्यांचेही आभार मानतो, असेही मिश्रा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button