राज्यातील १२ तालुक्यांचे होणार आता प्रशासकीय विभाजन | पुढारी

राज्यातील १२ तालुक्यांचे होणार आता प्रशासकीय विभाजन

मुंबई : चंदन शिरवाळे : विद्यमान तहसील कार्यालयांवर कामांचा वाढता बोजा, अनेक दिवस कामे रखडणे व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीस होत असलेला विलंब विचारात घेऊन राज्य सरकार राज्यातील बारा तालुक्यांचे लवकरच प्रशासकीय विभाजन करणार आहे.

तालुक्यासाठी विद्यमान तहसीलदार असताना आता त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार नियुक्त करून कामे आणि गावांचे वाटप केले जाणार आहे. अप्पर तहसीलदारांसाठी स्वतंत्र कार्यालय असेल. लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी, रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर या अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी पदनिर्मिती करण्यात येत आहे. सध्या तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची पदे मंजूर करण्यात आली असून, इतर पदे जिल्हा अथवा तालुका महसूल कार्यालयातून वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर तालुका, जळगाव जिल्ह्यातील जळगाव व चाळीसगाव तालुक्यातील मेहरबारी, जामनेर तालुक्यातील पहुर येथे, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्तावित आहे.

जिल्हानिर्मिती लाल फितीत

नवीन जिल्ह्याच्या मागणीसंदर्भात मात्र अद्याप कोणतीही चर्चा सुरू नाही. नवीन जनगणना होत नाही, तोपर्यंत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत विचार केला जाणार नाही, असे महसूल अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हेही वाचा : 

Back to top button