Nana Patole : वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय हलवण्यामागे महाराष्ट्राला बरबाद करण्याचा डाव : नाना पटोलेंचा आरोप | पुढारी

Nana Patole : वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय हलवण्यामागे महाराष्ट्राला बरबाद करण्याचा डाव : नाना पटोलेंचा आरोप

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई व महाराष्ट्राबद्दल दिल्लीतील भाजप सरकारला कायम आकस राहिला आहे. मुंबई व राज्याचे महत्त्‍व कमी करण्याचा विडाच मोदी सरकारने उचललेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले. आता मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असून, महाराष्ट्राला बरबाद करण्याच्या भाजपाच्या धोरणचाच भाग आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली . (Nana Patole )

 माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ” मुंबई व महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा व येथील पोषक वातावरण लक्षात घेऊन जगभरातून गुंतवणूक येत असते. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहे. शिंदे सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क आणि आता टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. याआधी फडणवीस सरकार असताना मुंबईतल्या ‘बीकेसी’मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमधल्या गांधीनगरला हलवण्यात आले. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला हलवले, नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली.

Nana Patole : चोर सोडून संन्याशाला फाशी

मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्योग पंचरत्न बिल्डिंगमध्ये होता यातील एक मोठा गट गुजरातला गेला. मुंबई व राज्यातील महत्त्‍वाची कार्यालये व प्रकल्प दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्याबाहेर स्थलांतरीत करण्यात आली आहेत. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी, नीरव मोदी, मेहुलभाईसारख्या उद्योगपती मित्रोंसाठीच काम करतात. देशातील १४० कोटी जनतेसाठी नाही, हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, हे सरकारच ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. एकीकडे राहुलजी गांधी देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहेत; पण मोदी सरकार मात्र त्यांना काहीही करून अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट उद्योगपतींना मात्र अभय दिले जात आहे. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’, या म्हणीसारखा मोदी सरकारचा कारभार आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

हेही वाचा : 

Back to top button