नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा | पुढारी

नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या गंभीर आजाराची दखल घेत, मलिक यांच्यावरील याचिका तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढच्या आठवड्यातच सुनावणी घेण्यात यावी; असे संकेत मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळावा यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज (दि.२४) सुनावणी झाली. मलिक गेल्या एक वर्षांपासून कोठडित आहेत. दरम्यान त्यांचा किडनीचा आजार देखील वाढला आहे. एक किडनी निकामी झाली आहे. तसेच कोणत्याही चाचणीसाठी न्यायालयाची परवानगी घेण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. याचा कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास होत आहे, असे मलिक यांच्या वकिलाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.

त्यानंतर मलिक यांची वैद्यकीय स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. तसेच या प्रकरणी पुढील आठवड्यापासून गुणवत्तापूर्ण सुनावणी घेण्यात येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरणी मंगळवारी(दि.२८) तातडीने सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

 

Back to top button