नारायण राणेंना अटक करताना पडद्यामागे काय घडले? | पुढारी

नारायण राणेंना अटक करताना पडद्यामागे काय घडले?

मुंबई,पुढारी ऑनलाईन: केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मंगळवारी अटक केली. मात्र, सकाळी आदेश निघाल्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत पडद्यामागे काय घडले ते उत्कंठावर्धक आहे. गृहखाते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खलबते झाली होती.

नारायण राणे यांना अटक करण्याआधी शिवसेनेने उग्र आंदोलन करत आपली ताकद दाखवली. राज्यात ठिकठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर दगडफेक झाली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि राणे यांच्या विरोधात शिवसेनेला राज्यभर मोठे आंदोलन उभे करायचे होते.

राणे यांना अटक करणे हा मुद्दा गौण होता, तर राणे जे वारंवार सेनेला डिवचतात त्याला उत्तर देण्याचे ठरले.

दिवाणी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला. त्यानंतर राणे यांनी तातडीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.

मात्र, जोपर्यंत सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याच्या सत्यप्रती मिळत नाहीत तोपर्यंत अर्ज दाखल करून घेण्यास नकार दिला.

तातडीची सुनावणी नाकारल्याने राणे अडचणीत आले. तेव्हा ॲडव्होकेट जनरल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी आपसात चर्चा झाली.

दोन्ही न्यायालयांनी राणे यांना दिलासा दिलेला नाही, त्यामुळे त्यांना अटक करणे हाच पर्याय असल्याच्या निष्कर्षाप्रत ते आले.

नारायण राणेंना अटक करण्याचा मार्ग खुला झाला.

सोमवारी संध्याकाळपासूनच राणे यांच्या अडचणी कशा वाढतील यादृष्टीने अभ्यास सुरू झाला. राणे यांचे विधान आल्यानंतर फीडबॅक घेण्यात आला.

आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याचाही आढावा घेण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे राणे यांच्या वक्तव्यावर प्रचंड संतापले होते. त्यामुळे राणे यांना धडा शिकविण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यावर ते ठाम होते.

अजित पवार आक्रमक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ठाम भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांविषयी कोणीही, काहीही बोलू लागले आणि आपण गप्प राहिलो तर उद्या प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना वाटेल ते बोलेल.

मुख्यमंत्री कोणीही असो, त्या पदाचा मानसन्मान राखला गेला पाहिजे. कारवाई हाच उपाय आहे, असे सांगत राणेंवर कारवाईसाठी आग्रही राहिले.

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेला निरोप दिला. परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रशासनाशी संपर्क साधत यंत्रणा कामाला लावली.

दुपारनंतर राणेंना आला अंदाज

युवा सेनेने राणे यांच्या जुहू येथील बंगल्यासमोर आक्रमक आंदोलन सुरू केले. त्याचवेळी राणे यांच्या अटकेच्या बातम्या सुरू झाल्या.

पोलिसांचे एक पथक अटकेसाठी निघाले असल्याच्या बातम्या सुरू झाल्या.

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अटकेचे आदेश काढले होते. पांडे हे सिंधुदूर्गचे पोलिस अधीक्षक होते.

त्यामुळे कोकणची खडा न खडा माहिती त्यांना होती.

अटकेचे आदेश निघाल्याचे स्पष्ट होताच राणे यांच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

मात्र, तो फेटाळला. एकूण राणे यांच्या अटकेची शक्यता बळावली.

गृहमंत्री वळसे पाटीलांची भूमिका?

दिवाणी कोर्ट आणि हायकोर्टाने दिलासा न दिल्याने राणे यांना कशाप्रकारे अटक करायची यावर चर्चा झाली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना तुमच्या पद्धतीने काम करा असे आदेश दिले. वळसे पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत गुप्तवार्ता आयुक्त आशुतोष डुंबरे यांना फोन करून माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी ‘आमच्या तुम्हाला कोणत्याही सूचना नाहीत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जे योग्य वाटते ते करा’ असे सांगितले. तशा बातम्या चालल्याने राष्ट्रवादीने परफेक्ट गेम केल्याची चर्चाही आहे.

राणेंना भाजपमधूनच शह

त्यांना अटक होण्याची चिन्हे असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘राणे यांना अटक झाली तरी जनआशीर्वाद यात्रा सुरू राहील’ असे सांगत एकप्रकारे ग्रीन सिग्नलच दिला. तर राणे यांना एकप्रकारे हा शह मानला जातो. राणे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ज्याप्रकारे प्रवीण दरेकर यांना बेदखल केले होते. त्याची भरपाई त्यांच्याकडे जनआशीर्वाद यात्रेचे नेतृत्व देऊन करायची अशी फडणवीस यांची अपेक्षा होती. मात्र, राणेंनी ती अपेक्षा धुडकावून लावली. राणे यांना अटक केल्यानंतर केंद्र सरकारमधून कोणाचीही प्रतिक्रिया आली नाही. शिवसेना दडपशाहीचे राजकारण करत आहे, असे चित्र तयार करायचे. दडपशाहीचा ठपका भाजपवर आहे. त्यामुळे प. बंगालमध्ये झालेले नुकसान भाजप विसरलेली नाही. महाराष्ट्रात ही खेळी खेळायची नाही. मात्र, हा एकूण डाव भाजपच्या अंगलट आल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: 

Back to top button