पुढारी ऑनलाईन डेस्क :
सर्वोच्च न्यायालयाकडून आज शिवसेनेच्या बंडखाेर आमदारांना दिलासा मिळाला. बंडखाेर आमदारांना आता नोटीसीला उत्तर देण्यासाठी ११ जुलैपर्यंतचा वेळ मिळाला आहे. या निकालानंतर बंडखाेर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय' असे ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा आहे. १२ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भातील कोणतीही कारवाई करु नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि शिवसेना गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. आता ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर 16 आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी नोटीस बजावली होती. त्यांना आज ( दि, २७) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कारवाईविरोधात बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि प्रतोद भरत गोगावले यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हेही वाचा