जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (दि.2) या अखेरच्या दिवसापर्यंत सरपंच पदाच्या 266 जागांसाठी सुमारे 1406 इच्छुक उमेदवारांनी तर सदस्य पदाच्या 2178 जागांसाठी सुमारे 6331 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जालना तहसील कार्यालयात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेपर्यत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये मुदत संपणार्या जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी तहसील कार्यालयांमध्ये भाऊगर्दी केली होती. उमेदवारांना अर्ज भरताना गैरसोय होऊ नये म्हणून स्वतंत्र टेबल लावण्यात आले होते. मात्र शेवटच्या दिवशी प्रत्येक तहसील कार्यालयात गर्दी झाल्याचे दिसून आले. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाइन स्वीकारण्यासह सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतची वेळ वाढवून दिली आहे. ऑफलाइनचे आदेश धडकताच तहसील कार्यालयांमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. निवडणुका होत असलेल्या सर्वच तालुक्यांमध्ये हीच परिस्थिती होती. जालना तहसील कार्यालयाबाहेर तर वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसही नियुक्त करण्यात आले होते. रात्री साडेअकरा वाजेपर्यत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
इच्छुक उमेदवारांना पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडून शेवटच्या दिवशी देण्यात आली. तसेच मुदतही वाढवून दिल्याने सरपंच व ग्रा. पं. सदस्यासाठी उमेदवारी अर्ज संख्या वाढली. शुक्रवारी सकाळपासून रात्री साडेअकरा वाजेपर्यत तहसील कार्यालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.
तालुका ग्रा.पं. संख्या सरपंच ग्रां.प. सदस्य
परतूर 41 208 966
घनसावंगी 34 199 948
जाफराबाद 55 274 1164
जालना 29 163 762
अंबड 40 250 1158
भोकरदन 32 155 701
मंठा 35 157 632
हेही वाचा :