घाटंजी, पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यातील किन्ही येथे बचत खात्याच्या पैसावरून एका युवकाचा चाकुने खून करण्यात आला. खून झालेल्या युवकाचे नाव प्रकाश प्रेमदास राठोड ( वय ३४) असे आहे. या घटनेची फिर्यादी भारत फुलसिंग राठोड ( वय ४५) यांनी दिली असून तिघांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भारत फुलसिंग राठोड यांच्या तक्रारीवरून अमोल सुभाष पवार ( वय २१), हेंमत सुभाष पवार (वय १९) व विरेंद्र भिमराव राठोड ( वय २९) यांच्याविरुद्ध घाटंजी पोलीसांनी अटक करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, फिर्यादी भारत फुलसिंग राठोड यांचा पुतण्या प्रकाश प्रेमदास राठोड याने गुरुवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वरील तिघांविरोध बचत खात्यातून (आरडी) पैसे मागितले. यानंतर अमोल, हेंमत आणि विरेंद्र या तिघांनी आम्ही तुझे पैसे देत नाही असे म्हणत त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. याच दरम्यान आरोपी हेंमत पवार याने घरातून चाकू आणून प्रकाश राठोडवर हल्ला केला. यावेळी प्रकाशचे दोन्ही हात अमोल व विरेंद्र पकडले होते. या हल्ल्यात प्रकाशचा मृत्यू झाला.
यानंतर फिर्यादी भारत याने प्रकाशचा या तिघांनी संगनमताने खून केल्याची माहिती घाटंजी पोलिसांत दिली. पांढरकवडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अमोल, हेंमत आणि विरेंद्र या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घाटंजीचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे हे पुढील तपास करीत आहे.
पोलिस पथकासह संबधित आरोपींना पोलीस कोठडी मिळविण्यासाठी घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात गेले असता तेथील न्यायाधीश रजेवर असल्याने आरोपीना पांढरकवडा येथील न्यायालयात नेत असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक किशोर भुजाडे यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का?