गेवराई (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील शहाजनपूर येथील चार मुलांचा सिंदफणा नदीतील वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली होती. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.
नदीच्या मधोमध घडल्याने बीड व गेवराई प्रशासनाने हद्दीबाबत एकमेकांकडे बोट दाखवल्याने मध्यरात्रीपर्यंत 4 मुलांचा मृत्यू नदीपात्रात पडून होते. यानंतर बीड, गेवराई महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी संयुक्तरित्या दोषींवर कारवाई करू तसेच त्याच्या कुटुंबाला विनाविलंब मदत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री दोन वाजता ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतले. सदरील दुर्दैवी घटना घडल्याने सुरवातीला बीड गेवराई प्रशासनाने एकमेकांकडे बोट केले होते.
दरम्यान, रात्री उशिरा गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे गेवराई पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके गेवराईचे सपोनि संदीप काळे व बीड ग्रामीणचे सपोनि योगेश उबाळे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अधिकारी ग्रामस्थांचा रोषाला सामोरे जावे लागले.
मात्र या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या त्या दोषींवर ठोस कारवाई करणार व या ठिकाणाहून वाळू उपसा आता होणार नाही, तसेच ग्रामस्थांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. शासकीय नियमानुसार त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व सहाय्य देणे बाबत विनाविलंब कारवाई करण्यात येईल. आदी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मुलाचे मृतदेह रात्री उशिरा ताब्यात घेतले.
गेवराई तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक विरोधात प्रशासन कारवाई करत असते. मात्र तरी देखील हा वाळू उपसा चालूच असतो. काल मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर तरी आता प्रशासनास जाग येईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदरील घटना ही मन हेलावून टाकणारी आहे. चौकशी करून लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येईल. तहसीलदार सचिन खाडे सदरील प्रकरणी समिती नेमली असून या घटनेचा तपास सुरू आहे .
हे ही वाचलं का ?