औरंगाबाद / करमाड, पुढारी वृत्तसेवा : चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला गेलेल्या भरधाव बोलेरो पिकअपला समोरून येणाऱ्या एसटी बसने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपमधील पाचजण जागीच ठार झाले तर, तिघे जखमी आहेत. मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश आहे.
बसच्या धडकेने पिकअपचा अक्षरश: चुराडा झाला असून अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. औरंगाबाद – जालना रोडवरील करमाड जवळील गाढेजळगाव येथील हॉटेल स्वराज मराठासमोर बुधवारी (दि. २५) सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या चारचाकी वाहनाचीही नंतर बसला धडक बसली.
शांतीलाल हरी चव्हाण (५०), अशोक जयसिंग चव्हाण (४५), रणजित जयसिंग चव्हाण (३८, तिघे रा. सातारा तांडा, औरंगाबाद), लता ज्ञानेश्वर जाधव (४०, रा. राजनगर, मुकुंदवाडी, बीड बायपास), लहू ज्योतिराम राठोड (५0, रा. रेणुका नगर, बीड बायपास, औरंगाबाद) अशी पाचही मृतांची नावे आहेत. तर, रोहित व विकास ढेरे हे बाप-लेक जखमी आहेत. मृतांमधील अशोक व रणजित चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ असून शांतीलाल चव्हाण हे त्यांचे काका आहेत. एकाच कुटुंबातील तिघे एकाचवेळी ठार झाल्याने सातारा तांड्यांवर शोककळा पसरली आहे.
करमाड पोलिसांनी सांगितले, लहू राठोड हे वॉटर प्रूफींगचे ठेकेदार आहेत. शांतीलाल, अशोक, रणजीत, लता हे त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करायचे. त्यांचे जालना येथे काम सुरु आहे. ते काम आटोपून पिकअपने (क्र. एमएच २१, बीएच ४३३१) जालना येथून सायंकाळी औरंगाबादेत परतत होते. त्यांचे पिकअप गाढेजळगाव शिवारात येताच चालकाचा ताबा सुटला आणि पिकअप दुभाजकावर चढला. त्यानंतर दोन ते तीन पलट्या घेऊन पिकअप विरुद्ध दिशेला गेला. त्याचवेळी औरंगाबादहून जालन्याकडे जाणाऱ्या भरधाव पुणे-कळमनुरी बसने (क्र. एमएच १३, सीयू ६८३८) पिकअपला उडविले. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा अक्षरश: चुराडा झाला. पिकअपमधील पाचजण जागीच ठार झाले. बसचेदेखील चाक तुटले.