हिंगोली : कॅनोलमध्ये आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह ; प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय
आखाडा बाळापूर (हिंगोली) ; पुढारी वृत्तसेवा
येथील दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह हदगावकडे जाणाऱ्या कॅनॉलमध्ये आढळला. तरुणाला मोबाईलवर आलेल्या संदेशामुळे या तरुणाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आखाडा बाळापूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ राजू सुभाष पोटे (वय-२२) राहत होता. रविवारी (दि.१५) राजू याच्या मोबाईलवर एक संदेश आला. यामध्ये लिहले होते की, “तू एकटाच याठिकाणी… भेटायला ये व मोबाईल घरी ठेव” यानंतर कुटूंबाकडे चौकशी केली असता, रविवारी (दि.१५) सकाळी सात वाजताच राजू मोबाईल घरात ठेवून निघून गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
रविवारी (दि.१५) सांयकाळी राजू घरी परतला नाही. त्याच्या कुटूंबाने आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. आज (दि.१७) सकाळी दहा वाजता शेळ्या चारणाऱ्या शेतकऱ्यांचा फोन दाती (ता. कळमनुरी) येथील काँग्रेसचे ता. अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांना आला. तरुणाचा मृतदेह कॅनॉलमध्ये टाकलेल्या पाईपला अडकलेला असल्याचे त्यांना कळवण्यात आला. धनंजय सूर्यवंशी आणि ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. आखाडाबाळापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
आखाडा बाळापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधणापोड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.पोलीस निरीक्षक बालाजी पुंड व जमादार बाबरशेख यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. या प्रकरणाचा तपास आखाडाबाळापुर पोलीस करीत आहेत.