![राज ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रान का उठवत नाहीत? : राजू शेट्टींचा सवाल](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2Fraju-sheeti.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारविरोधात असलेले राज्यात सत्तेत आहेत. तर राज्यात विरोधात असलेले केंद्रात सत्तेत आहेत. त्यामूळे दोन्ही विरोधकांना त्यांची भूमिका नीट पार पाडता येत नाही. त्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनामध्ये नुराकुस्तीचा खेळ असल्याचा संशय दिसून येताे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकिने, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारला पेट्रोल, डिझेल, गॅस, खत व इतर महागाईवर चर्चा नको आहे. तर राज्य सरकारला शिक्षणाचा झालेला खेळखंडोबा, भारनियमन विजेचा लपंडाव, शेतकरी आत्महत्या यावर चर्चा नको आहे. त्यामुळे केंद्रात व राज्यात असलेले विरोधक त्यांची भूमिका स्पष्टपणे पार पाडू शकत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. काही ठिकाणी पाणी आहे; पण वीज नाही, अशा अडचणी आहेत. वीज भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी भोंगे व हनुमान चालीसा यावरच प्रश्नावर चर्चा होऊ लागली आहे. राज्यात पूर्वी आर्थिक व इतर समस्यांवर चर्चा होत होत्या. मात्र आता त्याला जातीय वळण दिले जात असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चांगली व्यक्ते आहेत याबद्दल दुमत नाही. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राज ठाकरे रान का उठवत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडी सरकरने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षानंतरही शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास महाविकास आघाडी अपयशी ठरल्यामुळे आपण त्यातून बाहेर पडल्याचेही त्यांनी सांगितले.