हुपरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार- पाच दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली असून, इचलकरंजीचा लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरची वाहतूक मोठ्या पुलामार्गे वळविली जात आहे. याच दरम्यान नदी आणि लहान पुलाच्या कठड्याला मोठ्या प्रमाणावर केंदाळ अडकले असुन तरुण वर्ग मोठ्या पुलावर थांबून त्याचे फोटो घेत आहेत. त्यामुळे हा 'सेल्फी पॉईंट' च बनला आहे.
गेली चार- पाच दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे हुपरी परिसरातील इंगली, रांगोळी, अलाटवडी, रेंदाळ या गावांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. याआधी इंगली आणि रांगोळी येथील नागरिकांचे महापूरात मोठे नुकसान होते. पावसाळ्यात या भागातील आठ- दहा गावातील शेती पुरामुळे पाण्याखाली जाते. त्यामुळे गेली सलग काही वर्षे या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. पावसामुळे या भागातील रूई बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा महापूर येईल का? या कारणाने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, इचलकरंजी जवळच्या मोठ्या पुलावरुन लहान पुलावर अडकलेले केंदाळ सध्या तरुणांचा सेल्फी पॉईंट ठरला आहे. नागरिक मोठ्या पुलावर थांबून महापूराचे फोटो काढत आहेत. फोटोमध्ये केंदाळ अडकलेल्या ठिकाणचा पॉईंट टिपत आहेत. त्यामुळे मोठ्या पुलावर गर्दी होत असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार वाहनधारक करीत आहेत.
हेही वाचलंत का?