कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: तीन हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या शिपायाला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने आज सकाळी (दि.२१) अटक केली. महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा आणि पुनश्च हॉटेल सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आस्थापना दाखला देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली हाोती. शिवाजी दत्तात्रय चौगुले (वय ४३ रा, शिवनगर, आंबेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे.
जुलैमध्ये पंचगंगा नदीला महापूर आला. याचा माेठा फटका आंबेवाडी परिसरातील अनेक व्यावसायिकांना बसला हाेता. त्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले होते. तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून त्यांनाही महापुरात आर्थिक झळ सोसावी लागली होती.
नुकसानीचा पंचनामा आणि पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आस्थापना दाखला मिळावा याकरिता तक्रारदाराने आंबेवाडी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. नाहरकत दाखला देण्यासाठी संशयित शिवाजी चौगुले यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची खात्री केली असता संशयिताने तीन हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शिवाजी चौगुले याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : आठवणी कोल्हापूर गणेश उत्सवाच्या