…तर सहकुटुंब पायी मुंबईला जाण्याचा निर्धार | पुढारी

...तर सहकुटुंब पायी मुंबईला जाण्याचा निर्धार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटण्यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय न झाल्यास कोल्हापूर ते आझाद मैदान मुंबई असा सहकुटुंब चालत जाण्याचा निर्णय सोमवारी एसटी कर्मचार्‍यांनी घेतला आहे.

एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांच्या वतीने गेले 17 दिवस राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विभागातील कर्मचार्‍यांनी मागण्यांबाबत सरकारला जाग यावी, म्हणून पूजा, भजन, कीर्तन असे विविध प्रकार अवलंबले.

पण शासनाला जाग आली नाही. दरम्यान, या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शासन, परिवहन खाते आणि कर्मचारी यांच्यात बैठका होत आहेत. पण त्यातून ठोस निर्णय मिळत नाही. यामुळे कर्मचार्‍यांच्या भावना तीव— बनत आहेत. एसटीच्या विकासासाठी एवढे योगदान देऊनही महामंडळ कर्मचार्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे, यावर निकराचा लाढ देण्यासाठी कोल्हापूर ते मुंबई पायी जाण्याचा निर्धार कर्मचार्‍यांनी केला आहे. पण येत्या दोन दिवसांत संपाबाबत काही तरी निर्णय लागेल, अशी आशा कर्मचार्‍यांना आहे. जर दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर कोल्हापूर ते मुंबई सहकुटुंब मुंबईला जाण्याचा निर्णय कर्मचार्‍यांनी घेतला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button