कोल्हापूर : राधानगरी धरणातून पाणी सोडताना पूर्वसूचना द्यावी; मच्छीमारांची मागणी
गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात अचानक पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर मच्छीमारांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाणी सोडण्यापूर्वी नदी काठावरील गावांना पूर्व सूचना द्यावी, अशी मागणी भोई समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जलसंपदा विभागाला गुडाळवाडी येथील भोई समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
राधानगरी तालुक्यातील भोगावती नदी काठावरील अनेक गावांत भोई, कोळी, आणि बागडी समाजाच्या वतीने नदीत जाळी लावून मच्छीमारी केली जाते. नदीपात्रात पाणी कमी असताना मच्छीमार नदीच्या दुतर्फा सायंकाळी जाळी बांधून ठेवतात आणि सकाळी ती जाळी सोडून त्यामधील मासे पकडतात. या समाजातील अनेक कुटुंबांचे मासेमारी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र अनेकदा जलसंपदा विभागाकडून भोगावती नदीत रात्रीच्या वेळी पाण्याचा विसर्ग केल्याने नदीपात्रातील मासेमारीच्या जाळ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करताना जलसंपदा विभागाने नदी काठावरील गावांना पूर्व सूचना द्यावी, रात्री पाण्याचा विसर्ग करण्या ऐवजी दिवसा पाणी सोडावे, मच्छीमारांचे नुकसान टाळावे अशी मागणी भोई समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- धुळे : शरद पवार, संजय राऊत या चलनात न चालणाऱ्या फाटक्या आणि जीर्ण नोटा – आमदार गोपीचंद पडळकर
- परभणी : पाण्याअभावी पिके करपली; जायकवाडी धरणातून ताडकळस मायनरला पाणी सोडण्याची मागणी
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या होणार पुन्हा सुनावणी