शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : जठारवाडी ता. करवीर येथून पंढरपूर कार्तिकी एकादशी यात्रेसाठी निघालेल्या पायी दिंडीत भरधाव कार घुसून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी सायंकाळी सांगोला नजीक जुणोनी बायपासजवळ हा अपघात झाला होता.
मृत झालेल्या जठारवाडीतील सर्जेराव श्रीपती जाधव (वय ५२,) शारदा आनंदा घोडके (वय ६१) , रंजना बळवंत जाधव ( वय ५५) , सुनीता सुभाष काटे (वय ५०) , व शांताबाई जयसिंग जाधव (वय ६२) या पाच जणावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. तर वळिवडे येथील माय लेकरांवर अंत्यसंस्कार करणेसाठी ते दोन मृतदेह वळिवडेला पाठविले.
जठारवाडीतील मृतदेह रुग्णवाहिकेतून गावात आल्यानंतर गावात सर्वत्र आक्रोश सुरु झाला. आख्खा गाव दुःखात बुडाला . दिंडीतील सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असल्याने मृत व जखमींच्या साठी सर्वांना कठीण प्रसंगातून जावे लागत होते. सर्व मृतदेह ट्रँक्टर ट्राँलीमध्ये ठेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी या अंत्ययात्रेत परिसरातील अनेक गावातील नागरिक सहभागी झाले होते.
अंत्यसंस्कार वेळी प्रांताधिकारी नावडकर, तहसीलदार शीतल भूमरे, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, सरपंच नंदकुमार खाडे, उपसरपंच रूक्मिणी जाधव, बाबासाहेब चौगले, प्रदीप पाटील भुयेकर, बाजीराव पाटील, सर्व सदस्य गावांतील विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्राततील लोक उपस्थित होते. दरम्यान जखमी शानुबाई शियेकर, अनुसया शियेकर, अनिता जगदाळे, अनिता जाधव व सुभाष काटे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे
पाच जणांच्या मृत्यूमुळे गावात पै पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, लोकप्रतिनिधी यांची दिवसभर सांत्वन साठी रिघ होती. चार हजार लोकसंख्या असलेल्या छोट्याशा इतका मोठा भीषण अपघात पहिल्यांदाच घडल्याने ग्रामस्थ सैरभैर झाले होते. मात्र ग्रामस्थांनी एकजूट दाखवत, मृतांच्या कुटुंबियांना धीर देत अंत्यसंस्कारचे सोपस्कर पार पाडले यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. दरम्यान दोन जखमींवर सोलापुरात खाजगी रुग्णालयात तर तिघांवर कोल्हापूर मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
हेही वाचा;