शिरोळ तालुक्यात पुरस्थिती गंभीर, नागरिकांचे स्थलांतर सुरूच | पुढारी

शिरोळ तालुक्यात पुरस्थिती गंभीर, नागरिकांचे स्थलांतर सुरूच

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील बहुतेक गावामध्ये पुराचे पाणी आल्याने स्थलांतर करण्यास सुरूवात केली. शिरोळ तालुक्यातील मुख्य असलेल्या कुरूंदवाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिकलगार वाडा, मसवड रस्ता, गोठणपूर, कोरवी गल्ली, परिसरात महापुराचे पाणी आल्याने ८० टक्क्यांहून अधिक नागरिक जनावरांसह स्थलांतर झाले आहेत.

दरम्यान मजरेवाडी, टाकळीवाडी, गणेशवाडी, कनवाड, हेरवाड, शिरोळ, नांदणी यामार्गावर पाणी आले आहे. शिरोळ तालुक्यातील मुख्य जिल्हा मार्ग बंद झाल्याने दळणवळण ठप्प झाले आहे.

गुरूदत्त साखर कारखान्यावर नागरीकांची सोय

टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, बस्तवाड, चिंचवड व कुरुंदवाड शहरातील ९८० नागरिक व ६८० जनावरे स्थलांतरित झाली आहेत.

साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने दोन वेळचे जेवण नाष्टा व लहान मुलांसाठी दुधाची सोय केली आहे. कारखानास्थळावर एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत.

कुरुंदवाड शहरतील भैरवाडीचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

कुरुंदवाड शहरातील नागरिकांचे स्थलांतर
कुरुंदवाड शहरातील नागरिकांचे स्थलांतर

पावसाने कुरूंदवाड शहराच्या मुख्य गल्ल्या आणि वस्त्यांमध्ये पाणी आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

शिवतिर्थाजवळ पाणी आल्याने जयसिंगपूरकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बस्तवाड रस्त्यावर पाणी आल्याने अकिवाटकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

कुरुंदवाड-तेरवाड रस्त्यावर पाणी आल्याने इचलकरंजी बोरगावकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. मजरेवाडी मार्गे टाकळीवाडी असा कुरुंदवाड शहरातून बाहेर पडण्यासाठीचा एकमेव मार्ग खुला आहे.

अशा परिस्थितीत ही मुख्याधिकारी निखिल जाधव, नगरसेवक दीपक गायकवाड, यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते नागरिकांची मदत करत आहेत.

कुरूंदवाड नगरपालिका प्रशासन नागरिक व जनावरांचे स्थलांतर

कुरूंदवाड नगरपालिका प्रशासन नागरिक व जनावरांचे स्थलांतर युद्धपातळीवर करत आहे. काही नागरिकांनी या मार्गाचा अवलंब करत स्थलांतराला सुरुवात केली आहे.

पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह गुरुदत्त कारखान्याचा आसरा घेतला आहे.
२०१९ सालच्या महापुरात कुरुंदवाड शहरातील बाजारपेठेत पाणी आल्यानंतर दत्तवाड-सदलगा मार्गे कर्नाटक राज्याकडे तर बोरगाव मार्गे कागल तालुक्यात जाण्यासाठी मार्ग खुले होते.

मात्र शहरात अजूनही पाणी आलेले नाही तरी कर्नाटक राज्यातील सदलगा पूलावर, शिरदवाड-कारदगा पूल पाण्याखाली गेले आहेत.

काही नागरीकांना स्थलांतर होण्यासाठी ही अडचणी येत आहेत. यामुळे मार्ग काढत कारखान्यावर स्थलांतर व्हावे लागले आहे.

हे ही वाचा : 

हे ही पाहा 

Back to top button