इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांना दिलासा देणारी घोषणा कोल्हापूर 'संवाद' दौऱ्यादरम्यान वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेट, कै. शेठ फुलचंद शहा उद्यान येथे आयोजित 'संवाद' सभेत मंत्री शेख बोलत होते.
मंत्री अस्लम शेख यांनी आज इचलकरंजी येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करुन आपल्या संवाद दौऱ्याची सुरुवात केली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचं एकच सूत्र होतं ते म्हणजे जनकल्याण महाविकास आघाडी सरकार देखील हेच सूत्र प्रमाण मानून राज्य चालवित आहे.
अस्लम शेख पुढे म्हणाले की, यंत्रमाग धारकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समितीची व्याप्ती वाढवत प्रत्येक यंत्रमाग बहुल जिल्ह्यातील प्रतिनिधींचा समावेश या समितीमध्ये केला जाणार आहे. एक मंत्री म्हणून आजवर तुम्ही मला भेटायला येत होता मात्र यापुढे मी प्रत्येक वस्त्रोद्योग बहुल जिल्ह्याचा दौरा करुन त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे. धोरण निर्धारणाची प्रकिया आता मंत्रालयातील वातानुकूलित दालनात पार न पडला तुमच्यासाठीचे धोरण ठरविण्याचा अधिकार हा तुमचाच आहे असही ते वस्त्रोद्योग व्यावसायिकांना संबोधताना म्हणाले.
महाराष्ट्राचे मॅंचेस्टर अशी ख्याती असलेले शहर म्हणजे इचलकरंजी, मात्र आज खऱ्या मॅंचेस्टरमधील वस्त्रोद्योग देखील डबघाईस आलेला आहे. भविष्यात मॅंचेस्टरमधील लोक इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाबद्दल गौरवोद्गार काढतील असं काम आपल्याला करायच आहे.
हे ही वाचलं का