कोल्हापूर : आकनूर येथे उष्माघाताने १ हजार कोंबड्या दगावल्या
सरवडे: पुढारी वृत्तसेवा : आकनूर (ता. राधानगरी) येथील रंगराव अनंत पाटील यांच्या पोल्ट्रीतील जवळपास १ हजार कोंबडी आज (दि. १२) दुपारी दगावल्या. यामुळे त्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. मृत कोंबड्यांची जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठा खड्डा खणून विल्हेवाट लावण्यात आली.
आकनूर येथे जकींदरा नावाच्या शेतात सेवानिवृत्त एसटी कर्मचारी रंगराव पाटील व मुलगा अमर पाटील यांनी ४ वर्षापूर्वी पाच हजार खाद्याच्या मांसल कोंबड्यांची पोल्ट्री उभारली आहे. परंतु आज दुपारी त्यातील जवळपास १ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मुदाळतिठ्ठा येथील याराणा पोल्ट्री कंपनीला दिली. घटनास्थळी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली. कंपनीने कोंबड्यांना उष्माघाताचा स्ट्रोक आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. परंतु रंगराव पाटील यांना मात्र, सुमारे पाच लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे.
कोरोना काळात कोंबड्यांना बर्डफ्ल्यू झाल्याची अफवा पसरल्याने त्यांनी अख्खी पाच हजार कोंबड्यांची पोल्ट्री मोफत खाली करावी लागली होती. पक्षी, खाद्य, औषधोपचार, मजूर खर्च हे भागवताना नाकीनऊ आले होते. त्यावेळीही त्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. त्यातून कसेबसे सावरतात. तोच आज पुन्हा १ हजार कोंबड्या दगावल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने किमान नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा