देवरुख, पुढारी वृत्तसेवा : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तूरळ हरेकरवाडी येथे बोलेरो पिकअप आणि दुचाकीत भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर चालक व अन्य तीन प्रवाशी जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.३) सकाळी घडली.
विघ्नेश आत्माराम करंडे (वय २१, रा. तूरळ, पाचकलेवाडी) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धामणी पेट्रोल पंपावर काम करणारा विघ्नेश हा (MH08/AB4692) दुचाकीने आरवली ते धामणी प्रवास करत होता. याचवेळी समोरुन धामणी ते आरवली च्या दिशेने सुसाट वेगात (MH08/AB4692) पिकअप वाहन आले. चालक परेश हेमंत देवरुखकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला जात दुचाकीला फरफटत नेले. यात विघ्नेश गाडीवरून काही अंतरावर फेकला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर पिकअप रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. यात चालक परेश देवरुखकर याच्या पायाला किरकोळ मार लागला. तर पिकअपमधील रियांश समीर सकपाळ (वय ३, रा. धामणी) हिच्या डोळ्याला दुखापत झाली. सिया समीर सकपाळ (वय २६, रा. धामणी) किरकोळ जखमी झाली. तर पल्लवी सीताराम धामणकर (वय २४) हिचा हाताला गंभीर दुखापत झाली.
विघ्नेशला तीन बहिणी असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील आजारी असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो धामणी येथील पेट्रोल पंपावर नोकरी करत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, पोलीस कॉन्स्टेबल विश्वास बरगाले, चालक सचिन जाधव, खाडे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. विघ्नेशच्या मृतदेहाचे संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.