![Landslide](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fd8907120-8855-44c1-b250-813635ff3ac1%2F111.jpg?rect=0%2C0%2C1417%2C797&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चिपळूण शहर : शहरातील उपनगर गोवळकोट परिसरात असलेल्या तारा बौद्धवाडी येथील डोंगराच्या काही भागाची माती व दगड कोसळून परिसरातील काही घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत माहिती मिळताच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नगर अभियंता प्रनोळकुमार खताळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
गोवळकोट परिसरात गोविंदगडाच्या पायथ्यानजीक गेली अनेक वर्षे नागरिकांची घरे आहेत. कदमवाडी, तारा बौद्धवाडी अशा छोट्या वाड्या गोविंदगडाच्या पायथ्याशी असून, नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. काही वर्षांपासून गोविंदगडाच्या पायथ्याजवळील दरडी कोसळण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी अशाचप्रकारे दरडी कोसळून कदम वाडीतील अनेक घरांचे मोठे नुकसान देखील झाले. परिणामी, प्रशासनाने या ठिकाणच्या रहिवाशांना स्थलांतरित होण्याची नोटीस दिली. तसेच पावसाळी हंगामात दरडीचा धोका ओळखून संबंधित ठिकाणच्या वाडीतील रहिवाशांना स्थलांतराबाबत नोटीसा देण्यात आल्या.
दरवर्षी पावसाळी हंगामात दरडीचा धोका असलेल्या कुटुंबियांची गोवळकोट परिसरात तात्पुरती व्यवस्था समाज मंदिरात करण्यात येते. तसेच पाच-सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेतील कदमवाडीतील रहिवाशांना शासनाकडून पुनर्वसन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, जागेचा तीढा अद्यापही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत सुमारे दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज पुन्हा तारा बौद्धवाडी परिसरातील गोविंदगडाच्या पायथ्याशी डोंगराचा काही भाग कोसळला असून, परिसरातील रामलिंग चंद्रकांत मिसाळ, प्रदीप सखाराम पारदळे यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे.