जालना : हरिओमनगरात पुस्तकवाला बाप्पा | पुढारी

जालना : हरिओमनगरात पुस्तकवाला बाप्पा

जालना; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि दीड हजारापेक्षा अधिक पुस्तकांची आरास मांडत हरिओमनगरात कवयित्री
आरती सुहास सदाव्रते यांनी सजावट केली आहे. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, कृष्ण, दासबोध, भारतीय संविधान, सानेगुरुजी, स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल पुस्तकांसह लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे, साधना आमटे यांचे ‘समिधा’ अशा पुस्तकांची आरास मांडण्यात आलेली आहे. ग्रंथ हेच गुरू आणि ग्रंथ हीच संपत्ती असा विचार करीत यंदाचा गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सदाव्रते परिवाराने घेतला.

दोन वर्षांपासून निर्बंध होते, अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी मस्तक घडविणारे पुस्तक असते, असा विचार घेत घरातील पुस्तकांची आरास मांडण्याचा विचार सुयोग सायली या मुलांनी बोलून दाखविला. एका दिवसात विविध विषयांवरील पुस्तकांची मांडणी करीत सजावट करण्यात आली.गणपती आरास सजावटीत साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकासह ‘भारतीय संस्कृती, मंदिर प्रवेशाची
भाषणे अशी 25 पुस्तके आहेत. गणपतीसमोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता, संन्यस्त, खड्ग आणि बोधिवृक्ष अशी पुस्तके आहेत. स्वामी विवेकानंद जीवनचरित्र, युवा चेतना, आदर्श शिक्षण ही पुस्तके ठेवण्यात आलीआहेत.

समर्थ रामदास स्वामी यांचे ‘दासबोध’, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांचे अभंगाचे पुस्तके आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ‘ग्रामगीता’, कवी बा.भ.बोरकर यांचा ‘आनंद भैरवी’ हा कवितासंग्रह, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा ‘धृपद’ हा कवितासंग्रह असून मराठी बखर गद्य हे पुस्तक आहे. साधना आमटे ‘समिधा’, सुनीता देशपांडे यांचे आहे. यासह विविध प्रकारचे पुस्तके मांडण्यात आली आहे.

विविध प्रकारची पस्तके गणेशोत्सव साजरा करताना वैचारिक परंपरा जोपासली जावी, अशी अपेक्षा आहे. आम्ही धार्मिक, वैचारिक,
सामाजिक, सांस्कृतिक, महिला अशा विविध विषयांवरील पुस्तके मांडली आहे. दोन दिवसांपासून पुस्तकांची तयारी चाललेली होती. जवळपास दीड हजार पुस्तके यात आहेत.
-आरती सदाव्रते,
हरिओमनगर, जालना

Back to top button