औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील 30 नाल्यांवरील पुलांवर जाळ्या बसवण्याचे नियोजन होते, यांपैकी आतापर्यंत 16 ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या असून, पावसाळ्यापूर्वीच हे पूल जाळीबंद करावे लागणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही पुलांवर जाळ्या बसवण्याचे काम सुरू झाले असले, तरी हे काम पूर्ण होणार कधी,असा प्रश्न आहे. उघड्या नाल्यांवरील पुलावर जाळ्या बसवणे हा महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा एक भाग आहे.
येत्या काही दिवसांत शहरात पावसाला सुरुवात होणार असून अद्यापही अनेक नाले हे उघडे आहेत. शहरातील काही नाल्यांची सफाई होणे अद्यापही बाकी आहे, अशा नाल्यांमध्ये रस्त्यावरूनही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येतो, यामुळे हा नाला तुंबून पावसाळ्यात अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होऊन, नाले पुलाबाहेर वाहण्याची स्थिती निर्माण होते.
शहरातून वाहणार्या नद्या आणि नाल्यांवरच्या काही पुलांवर लोखंडी जाळी बसवण्याचे काम करण्यात आले, तर काही काम अद्यापही शिल्लक आहे. शहरातील नाले तसेच नदींवर असलेल्या पुलांवरया जाळ्यांद्वारे सुशोभीकरण करण्याचे नियोजन असून, यांपैकी सुमारे 16 ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
शहर व परिसरात नाल्यांमध्ये नागरिकांकडून कचरा टाकणे, हॉटेल व्यावसायिकांकडून शिल्लक राहिलेले अन्न रात्रीच्या वेळी पुलावरून नदीच्या पात्रात टाकण्याच्या प्रकारामुळे नाला तुंबण्याचे प्रकार झाले होते,
पावसाळ्यात महापालिका प्रशासनाला या मोठ्या डोकेदुखीला सामोरे जावे लागते. सुमारे दहा फूट उंच अशी जाळी
पुलाच्या दोन्हीही बाजूंनी बसवली जाणार आहे.
महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या बैठकीमध्ये नाल्यांवरील जाळ्यांचा विषय निघाला
होता, त्यावेळी पावसाळ्यापूर्वीच या जाळ्या बसवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
शहरात ज्या नाल्यांवर शक्य असेल, त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी कर्टन क्रिपर (वेल) लावण्याचे
नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे. या कामालाही सुरुवात करून वेग द्द्यावा लागणार आहे. कर्टन
क्रिपरच्या माध्यमातून नाल्यांमधून येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय या नाल्यांचे या
माध्यमातून सुशोभीकरणही होणार आहे