अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या काळात यंदा सार्वजनिक मंडळांना भेटी देऊन पोलिस मंडळांच्या तक्रारी जाणून घेतील. सोबतच कायद्याबाबत मार्गदर्शनही करतील. पोलिस प्रशासनाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व नागरिकांमध्ये 'खाकी'चा विश्वास निर्माण करण्यासाठी हा अभिनव उपक्रम यंदा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार आहे. राकेश ओला यांच्याशी विशेष संवाद साधला असता त्यांनी 'पुढारी'ला ही माहिती दिली.
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. या सर्व मंडळांना यंदा पोलिस भेटी देणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलांची फसवणूक होऊ नये, अफवेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, संशयितांची माहिती मिळावी यासाठी पोलिस गणेशोत्सवाच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. पोलिस व जनतेतील संवाद वाढविण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश ओला यंदा 'संवाद गणेश भक्तांशी' हा अभिनव उपक्रम राबविणार आहेत.
एखादी घटना होण्यापूर्वीच कळाली तर ती नियंत्रणात आणणे शक्य असल्यामुळे पोलिसांकडून प्रबोधनासह जनजागृती थेट नागरिकांत जाऊन केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांत पोलिस आपले मित्र आहेत ही भावना जागृत करण्यासाठी हा संवाद असल्याचे ओला यांनी सांगितले. जिल्ह्यातील 32 पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना देण्यासाठी एक पुस्तिका तयार केली आहे. त्यामध्ये गणेशोत्सव काळात पाळावयाच्या सूचना, नियमांची माहिती देण्यात आली आहे. सोबतच नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास संपर्क करण्यासाठी पोलिस अधिकार्यांचे मोबाईल क्रमांक या पुस्तिकेत देण्यात आले आहेत.
सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, महाविद्यालयीन मुले सायबर चोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी गणेशोत्सव काळात पोलिसांकडून मंडळाच्या ठिकाणी जाऊन सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे.
हेही वाचा