अंगणवाडी सेविकांचा एल्गार ; काम बंद आंदोलन सुरू | पुढारी

अंगणवाडी सेविकांचा एल्गार ; काम बंद आंदोलन सुरू

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा मिळावा व मानधन नको तर वेतन हवे, यासह विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या सर्व सेविका व मदतनीस यांची कर्जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मैदानामध्ये बैठक झाली. या वेळी संघटनेच्या तालुकाध्यक्ष सुनीता कुलकर्णी, लीलाबाई राऊत, आशा शिंदे, सारिका परहर, संगीता खेडकर, सरस्वती शिंदे, रजनी निंबोरे, शोभा थोरात, कांता घोडके, दीपाली गावडे, चंदाताई ढोबे, कमल तोरडमल, केशरबाई घालमे यांच्यासह मोठ्या संख्येने सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या :

या वेळी संगीता कुलकर्णी म्हणाल्या, की राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील सर्व जण सहभागी झाले आहोत. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून सेविका व मदतनीस अवघ्या 110 रुपयांपासून काम करत आहेत. अनेकांची सेवानिवृत्ती झाली असून काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. एवढे वर्ष काम करूनही आज साडेपाच हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते.

शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या संदर्भात सर्व कार्य या सेविका व मदतनीस यांना कराव्या लागतात. माता संगोपनापासून ते बालकांच्या सर्व वाढीपर्यंतचे काम सेविका व मदतनीस यांना करावे लागते. कोरोना काळात देखील सेविका व मदतनीस यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केले.

मात्र आमच्या कामाची कोणतीही दखल सरकारकडून घेतली जात नाही. आज वाढलेली प्रचंड महागाई यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवताना मेटाकुटीला येत आहे. अनेकांना आमच्यानंतर वेतन सुरू झाले आहे; मात्र सेविका व मदतनीस यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. राज्य सरकारकडे गेल्या अनेक वर्षांपासून मोर्चे आंदोलने करून आमच्या मागण्या मांडत आहोत. मात्र सरकार दखल घेत नाही. यामुळे आजपासून ऑनलाईन काम पूर्णपणे बंद केले आहे. चार तारखेपासून संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व सेविका व मदतनीस यांनी घेतला आहे.

आता माघार न घेण्याचा निर्धार
सरकारने दिलेले मोबाईल निकृष्ट आहेत. बंद पडलेले आहेत. यामुळे सेविकांना स्वतःचे मोबाईल वापरावे लागत आहेत. यामुळे आता राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे सुनीता कुलकर्णी यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व सेविका व मदतनीस यांनी जोरदार घोषणा या वेळी दिल्या. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार या वेळी जाहीर करण्यात आला.

Back to top button