धनगर समाजाचा चौंडी ते मुंबई मोर्चा स्थगित; अक्षय शिंदे यांची माहिती
कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 4 ऑक्टोबरला निघणारा चौेंडी ते मुंबई मोर्चा स्थगित केल्याची माहिती अहिल्यादेवी होळकरांचे वंशज अक्षय शिंदे यांनी ‘पुढारी’ला दिली. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने वीस दिवस आंदोलन करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी शिष्टाईने आंदोलन मिटले. सरकारच्यावतीने 50 दिवसाची मुदत मागितली होती. याशिवाय विशेष न्यायाधीशांची नेमणूक ही करण्यात येणार असल्यामुळे आंदोलकांनी हा निर्णय मान्य करत आंदोलन स्थगित केले होते.
मात्र समाजाचा आरक्षणाचा लढा सुरूच ठेवण्यासाठी चौंडी येथून 4 ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार यशवंत सेनेच्या पदाधिकारी, कार्यर्के तसेच समाज बांधवांनी घेतला होता. त्यानुसार आंदोलनाची तयारी देखील झाली होती. मात्र काही तांत्रिक अडचण तसेच सरकारला वेळ द्यावा या उद्देशातून 4 ऑक्टोंबर रोजी मंत्रालयावर चौंडी येथून काढण्यात येत असणारा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. सरकारची आगामी भूमिका पाहून नंतर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अक्षय शिंदे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा
Pune News : लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! पुण्यात गंभीर समस्या