अहमदनगर जिल्ह्यात 1850 प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र होणार! | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात 1850 प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र होणार!

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना शेतीशी संबंधित सर्व निविष्ठा व सेवा एकत्रिपणे मिळाव्या, पारंपरीक खतांबाबत शेतकर्‍यांना प्रोत्साहीत करावे, सेंद्रीय शेतीकडे शेतकर्‍यांची वाटचाल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र सुरु करण्यात आले आहेत, असे सांगत नगर जिल्ह्यात 1850 केंद्र सुरु होणार असल्याची माहिती महसूल, तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली. या संदर्भात मंत्री विखे पा. म्हणाले, पंतप्रधान किसान किसान समृध्दी केंद्र हे शेतकर्‍यांसाठी एक स्टॉकशॉप म्हणून काम करीत आहेत.

एकाच छताखाली वाजवी किमतीत खते, बियाणे, किटकनाशके व दर्जेदार कृषि निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासह माती परीक्षण, बियाणे व खतं चाचणीची सुविधा या केंद्राशी जोडल्या आहेत. या केंद्राच्या माध्यमातून खतांच्या वापरास प्रोत्साहन,संतुलित खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलेल्या सेंद्रीय शेतीच्या संकल्पनेकडे शेतकर्‍यांना वळविणे हे मोठे काम होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शासकीय कृषी योजनांची माहिती देण्याचे काम या केंद्रातून यशस्वीपणे सुरु होईल. शेतकर्‍यांना उत्पादनापासून ते वितरण व्यवस्थेपर्यंत प्रशिक्षित करणे, प्रामुख्याने शेतकर्‍यांची होणारी फसवणूक टाळण्यास या केंद्राची मोठी मदत होईल, असा विश्वास मंत्री विखे पा. यांनी व्यक्त केला.

देशातील या केंद्रांची संख्या आता वाढविण्यात आली असून, आज (गुरुवार दि. 27 जुलै) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणालीतून देशातील 1 लाख 25 हजार केंद्राचे लोकार्पण होणार आहे. राज्यात 14 हजार केंद्र सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये 1850 केंद्र कार्यान्वित होत आहेत. यापैकी 510 केंद्राचे उद्घाटन स्थानिक पातळीवर मान्यवरांसह शेतकर्‍यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन केले आहे.

या केंद्राच्या माध्यमातून शेतक-यांना कृषी योजनांशी जोडून घेणे, योजनांचा लाभ मिळवून देणे याबरोबरीने कृषी क्षेत्रातील बदलांबाबत योग्यतो संवाद कृषी तज्ज्ञांच्या माध्यातून या केंद्रातून व्हावा हा प्रयत्न आहे. कृषी क्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमुलाग्र बदल करतानाच शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालास हमीभाव देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले. खतांच्या किमती नियंत्रीत राहण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले. यासह किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य ठरेल असे धोरण घेवून ही योजना यशस्वी करुन दाखविली. या योजनेचा 14 वा हप्तादेखील पंतप्रधान आज शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करणार असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेसारखी महत्वकांक्षी योजना सुरू केल्याचे सांगत, राहाता तालुक्यात 137 केंद्र सुरु होत आहेत. या केंद्राचे औपचारीक उद्घाटन बाभळेश्वर येथे कृषी विज्ञान केंद्रात आज सकाळी 11 वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांशी साधणारा संवाद दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमास शेतकरी, फार्मस प्रोड्यूसर कंपन्या व शेतकरी गट सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांनी केले आहे.

राज्यामध्ये आज सुरु होणार 14 हजार केंद्र..!

आज (गुरुवार दि. 27 जुलै) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणालीतून देशातील 1 लाख 25 हजार प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्रांचे लोकार्पण होणार आहे. राज्यात 14 हजार केंद्र सुरू होत असल्याचे माहिती महसूल, तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी यावेळी बोलताना दिली.

हेही वाचा

अहमदनगर तालुक्यात 85 टक्के पेरण्या

पुणे : ‘उड्डाण’अंतर्गत 15 विमानसेवा सुरू करणार

पाथर्डी : पावसाने विजयनगर रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमध्ये साठले पाणी

Back to top button