नगर: रुईछत्तीशी परिसर बनला कांदा आगार! पावसाची चांगली साथ; शेतकर्यांचा कल इतर पिकांकडेही

रुईछत्तिशी (नगर), पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील रुईछत्तिशी, वाळकी, राळेगण परिसर कांद्याचे आगार बनले असून, गेल्या दोन वर्षांपासून नगर तालुक्यात पावसाची चांगली साथ मिळल्याने शेतकर्यांनी विक्रमी कांद्याचे उत्पन्न घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांनी इतर पिके घेतली; परंतु शेतकर्यांची आर्थिक उलाढाल झाली नाही. कांद्याने अनेक वेळा शेतकर्यांना रडवले. अनेक वेळा कांद्याने साथ दिल्याने कांदा घेण्याची शेतकर्यांची इच्छाशक्ती कमी झाल्याचे दिसून आले.
नगर तालुक्यातील रुईछत्तिशी, वाळकी, राळेगण परिसरात 800 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली होती. या परिसरात एकरी 300 गोणी उत्पन्न शेतकर्याने घेतले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढले असून, सध्या कांदे काढून झाल्याने बाजार भाव कमी असल्याने वखारित कांदे साठवून ठेवण्याची लगबग सुरू आहे. साठवून ठेवलेल्या कांद्याला नंतरच्या काळात चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो. यंदा या भागातील शेती कांद्याचे आगार बनले आहे. बाजार चांगला मिळाला, तर शेतकर्यांची सुगी, नाही तर लाखो रुपयांचा खर्चही वसूल होतो की नाही याची पंचाईत होते. यामुळे चांगला बाजारभाव मिळाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
नगर तालुक्यातील रुईछत्तिशी, वाळकी, राळेगणचा परिसर दुर्गम मानला जातो. आजही या परिसरात पुरेसे हक्काचे पाणी मिळालेले नाही. परंतु, मागील तुलनेत हा बराचसा परिसर बागायती झाल्याने शेतकर्यांना अच्छे दिन आले. या परिसरातील अनेक मुले नोकरीसाठी परगावी असल्याने ते शेतीला आर्थिक सहाय करतात. यावर शेतकरी कष्ट करून चांगले उत्पन्न घेतो. यावरून हा परिसर नगर तालुक्यातील एक मोठा कांदा उत्पादित प्रदेश बनला आहे.
हेही वाचा:
नगर: जामखेडमधून गुटखा जप्त, चौदा लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक
नगर: कारची काच फोडून रोकड पळविणारे अटकेत