नगर : पुढारी वृत्तसेवा
जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडातील तीनही आरोपींना प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी निर्दोष मुक्त केले. प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव, आरोपी दिलीप जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
21 ऑक्टोबर 2014 रोजी जवखेडे खालसा (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतदेहाचे तुकडे करून बोरवेल, विहिरीत टाकले होते. याप्रकरणी मृत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याने पाथर्डी ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.
मानसशास्त्रीय चाचणीनंतर वरील आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात 54 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने ठेवलेले आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, असे म्हणून न्यायालयाने तीनही आरोपींना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले, अशी माहिती आरोपीचे वकील सुनील मगरे यांनी दिली.