नाशिक : अतिक्रमण निर्मूलन, नगररचनातील टोलवाटोलवीमुळे रखडली ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीची कारवाई | पुढारी

नाशिक : अतिक्रमण निर्मूलन, नगररचनातील टोलवाटोलवीमुळे रखडली 'ब्लॅक स्पॉट'मुक्तीची कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अतिक्रमण निर्मूलन आणि नगररचना विभागातील टोलवाटोलवी अखेर महापालिकेला भोवली असून, शहरातील मुख्य रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीची कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. पंचवटीतील हॉटेल मिरचीलगतच्या चौकातील बस दुर्घटनेला आता दीड वर्षाचा कालावधी उलटला, तरी ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे ‘जैसे थे’ राहिली आहेत.

छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरचीलगतच्या चौकात दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या बस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नाशिक शहरातील सर्वच रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट अर्थात अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेसह जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेला दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व नाशिक महापालिकेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात शहरात २६ ब्लॅक स्पॉट असल्याचे आढळले होते. या ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमणे महापालिकेने हटवली होती. त्यानंतर उर्वरित ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवणे अपेक्षित होते. त्यासाठी नगररचना विभागामार्फत रेखांकन हाेणे आवश्यक होते. याकरिता अतिक्रमण निर्मूलन विभागाने नगररचना विभागाला दि. २३ जानेवारी २०२३ रोजी पहिले पत्र दिले होते. नगररचना विभागाचा प्रतिसाद नसल्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाने दि. २० मार्च २०२३ रोजी दुसरे, दि. ११ एप्रिल २०२३ रोजी तिसरे, दि. १२ जून रोजी चौथे, तर दि. ११ आॉगस्ट रोजी पाचव्यांदा स्मरणपत्र दिले. मात्र अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या या पत्रांची दखल नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती. यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर नगररचना विभागाने अतिक्रमणांसंदर्भात अहवाल सादर केला होता. मात्र प्रत्यक्ष डिमार्केशन केले नाही. त्यामुळे कारवाई लांबली होती. या अहवालाच्या आधारेच ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय अतिक्रमण निर्मूलन विभागाने घेतला होता. त्यानुसार पंचवटीतील तीन ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्याची तयारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने सुरू केली होती. परंतु अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केल्यानंतर व्यावसायिक, विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही उपस्थित झाल्याने कारवाई लांबली होती. या दरम्यान लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने ब्लॅक स्पॉट मुक्तीची कारवाई आता थंड बस्त्यात गेली आहे. लोकसभा निवडणुकांनंतरच आता या कारवाईला मुहूर्त लागणार आहे.

नगररचना विभागाकडून ब्लॅक स्पॉटवरील पी.टी.शीट प्राप्त होण्यास विलंब झाला. या दरम्यान, कारवाईचा निर्णय लांबल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई पुढे ढकलावी लागली आहे. – नितीन नेर, उपायुक्त, अतिक्रमण निमूर्लन.

हेही वाचा:

Back to top button