शिवसेनेने म्हंटलंय, “महागाईवर भाजप आंदोलकांची दातखीळ बसली आहे” | पुढारी

शिवसेनेने म्हंटलंय, "महागाईवर भाजप आंदोलकांची दातखीळ बसली आहे"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून महागाईवरून केंद्रावर जोरदार टीका केली आहे. सत्तेवर येण्यासाठी वापरल्या गेलेल्या ‘बहोत हो गई महंगाई की मार…’, या घोषवाक्याची टॅगलाईन आता कुठेच नजरेस पडत नाही, अशी टीका शिवेसेनेने भाजप सरकारवर केली आहे.

“पिठापासून मिठापर्यंत, चहा-साखरेपासून भाजीपाल्यापर्यंत, अन्न-धान्यापासून खाद्यतेलापर्यंत, बियाणांपासून खंतापर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत सगळ्याचेच भाव भडकले आहेत. महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढून नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत.”

“एरवी एखाद्या नटीच्या बेकायदा बांधकामासह कुठल्याही फुटकळ विषयावर छाती बडवत हाय तौबा माजवणारी मंडळी आता भडकलेल्या महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर मात्र तोंड उघडायला तयार नाहीत”

“कधीकाळी याच महागाईच्या प्रश्नावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत नरडी बसेपर्यंत घोषणा करणाऱ्या, कॅमेऱ्यासमोर येऊन महागाईविरोधात सरकारला जाब विचारणाऱ्या तत्कालीन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे”, असे सेडतोड टीका शिवसेनेने केंद्रावर केली आहे.

महागाई
शिवसेनेने म्हंटलंय, “महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या गरीबांनी जगायचं कसं?”

“पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅसचे दर भडकत आहेतच, पण सीएनजीच्या किमतीमध्येही किलोमागे २.५८ रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती पाईपलाईन गॅसची किंमती ५५ युनिटमागे वाढवली आहे. आधीच कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.”

“ही दरवाढ कधी? तर जेव्हा कोरोनामुळे सगळे काही ठप्प पडले आहे तेव्हा! कोरोनासारख्या संकटकाळात गॅस सिलिंडरचे दर २५ आणि ८४ रुपयांनी वाढविणे याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकारच्या संवदेना हरवल्या आहेत”

“महागाईविरोधात लढणारा पक्ष म्हणून देशवासीयांनी भाजपला दिल्लीच्या तख्तावर बसवले. आता महागाईचे संकट दूर होणार, खिाशात पैसेच पैस खुळखुळणार, अच्छे दिन येणार या भाबड्या समजुतीतून देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतेने भरभरून भाजपच्या पात्रात मतदान टाकले.”

“केंद्रात दोन वेळा भाजपचे सरकार बहुमताने निवडून दिले. मात्र, सत्तेवर येऊन सात वर्षे झाली, तरी सरकारला महागाईचा राक्षक अजूनह मारता आलेला नाही. उलट महागाईचा भडका दिवसेंदिवस वाढतोच आहे”, असंही शिवसेनेने म्हंटलं आहे.

“या महागाईवर छोटा उतारा म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढविण्याचा ताजा निर्णय सरकारने घेतला. काही लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असला, तरी महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या कोट्यवधी गोरगरीब जनतेने कसे जगायचे, याचे उत्तर सरकारकडे आहे काय?”, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

पहा व्हिडीओ : हेमांगी कवी म्हणते, “ब्रा आणि बुब्जवर मी बोलले कारण…”

हे ही वाचलंत का?

Back to top button