Rainfall in Maharashtra | बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाची हजेरी; पुढील २४ तास बरसणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि.२८) राज्यभर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. दरम्यान, पुढील २४ तास महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बाप्पाच्या निरोपाला वरुणराजादेखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत दिली आहे. (Rainfall in Maharashtra)
डॉ. होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील २४ तासांत राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पाऊस पडेल असेही हवामान विभागाने म्हटल्याचे होसाळीकर यांनी सांगितले.
28 Sept,
Nest 24 hrs rainfall guidance from IMD.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता pic.twitter.com/5i1G7dx73j— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 28, 2023
30 सप्टेंबरपर्यंत राज्यात मुसळधारेचा जोर कायम
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली होती. मात्र, कमी दाबाचे पट्टे, तसेच इतर पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. दरम्यान राज्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरू असून, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांत राज्यातील बहुतांश भागात 100 मिमीच्या आसपास पाऊस पडला आहे. दरम्यान, 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधारचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.