पुणे : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र असतानाही गैरमार्गाने पात्र झालेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या राज्यातील नाशिक, धुळे व जळगाव, नंदूरबार या चार जिल्ह्यांत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
टीईटी 2019-20 मध्ये पात्र नसतानादेखील गैरव्यवहार करून पात्र केलेल्या 7 हजार 880 उमेदवारांची यादी पोलिसांनी शिक्षण विभागाला पडताळणीसाठी दिली होती. त्यातील तब्बल 3 हजार 578 उमेदवार या चार जिल्ह्यांत गैरमार्गाने पात्र झाल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणातील 15 जणांविरोधात सायबर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 3 हजार 955 पानांचे हे दोषारोपपत्र आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर सेलने टीईटी गैरव्यवहार प्रकरणात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर, राज्य शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख, माजी संचालक अश्विन कुमार व इतर एजंट यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना 2019-20 च्या टीईटी परीक्षेमध्ये पात्र नसतानाही सात हजार 880 उमेदवार पात्र ठरविल्याचे समोर आले होते.
मुंबई दक्षिण – 40, मुंबई पश्चिम – 63, मुंबई उत्तर – 60, रायगड – 42, ठाणे – 257, पालघर – 176, पुणे – 395, अहमदनगर – 149, सोलापूर – 171, नाशिक – 1154, धुळे – 1002, जळगाव – 614, नंदुरबार – 808, कोल्हापूर – 126, सातारा – 58, सांगली – 123, रत्नागिरी – 37, सिंधुदुर्ग – 22, औरंगाबाद – 458, जालना – 154, बीड – 338, परभणी – 163, हिंगोली – 43, अमरावती – 173, बुलडाणा – 340, अकोला – 143, वाशिम – 80, यवतमाळ – 70, नागपूर – 52, भंडारा – 15, गोंदिया – 09, वर्धा – 16, चंद्रपूर – 10, गडचिरोली – 10, लातूर – 157, उस्मानाबाद – 46, नांदेड – 259.
प्रमुख एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ हे प्रामुख्याने औरंगाबाद आणि बुलडाणा येथील असले तरी त्यांनी राजेंद्र सोळुंके, मुकुंदा सूर्यवंशी, सुरंजित पाटील यांच्यामार्फत नाशिक विभागातील परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे गोळा केले होते. औरंगाबादमधील तीन क्लासचालकांनी त्यांच्याकडे येणार्या औरंगाबाद व मराठवाड्यातील परीक्षार्थींना पेपर पुरविले होते. त्यामुळे नाशिक खालोखाल औरंगाबाद विभागातील सर्वाधिक अपात्र परीक्षार्थींना पात्र करून घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.