सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असणार्या महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांची बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षापद्धतीसाठी आग्रह आहे. या मागणीसाठी बुधवारी विद्यार्थ्यांचे सोलापूर विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने कोरोना निर्बंध 1 एप्रिल 2022 रोजी हटवले. यानंतर कमी अधिक प्रमाणात महाविद्यालय सुरु करण्यात आले.
विद्यापीठातील सर्व शाखांतील कला, शास्त्र, वाणिज्य, विधी, अभियांत्रिकी, व्यवसायिक व्यवस्थापन व अन्य शिक्षणक्रम अशी निगडित पदविका, पदवी, पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी निर्धारीत असणारे अभ्यासक्रम,त्याचा अध्यापन कालावधी, विद्यार्थ्यांचे आकलन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात येण्यासाठी लागणारी दळणवळणाची साधने, महाविद्यालयात झालेल्या तासिका तसेच अत्यंत गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे होती तशी ती घेतली गेली नाही.
दीड वर्षाच्या प्रदीर्घ खंडीत कालावधीनंतर परीक्षेस सामोरे जावे लागत असणारी ऑफलाईन परीक्षा या सर्व बाबी विद्यार्थ्यांवर एक प्रकारचे मानसिक दबाव वाढवणारे आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या वर्षीच्या जून-जुलै दरम्यान ची परीक्षा ही बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षा पद्धतीने घेण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी हलगी नाद, शंख नाद व घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. यावेळी तब्बल दोन तास विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पोलीस प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली. कुलगुरुंकडे गेलेल्या शिष्टमंडळात अनिल वासम, केशव इंगळे, अविनाश इंगळे, संदीप क्षीरसागर, अभिषेक थोरात, शामसुंदर आडम, विद्यार्थी आघाडी एस.एफ.आय.चे मल्लेशम कारमपुरी, भरत जाधव, विजय गुंड, संतोष म्हमाणे, कृष्णा बाबरे, सम्यक गायकवाड, संतोष चव्हाण, चैतन्य केंगार , आनंद गोसकी आदी उपस्थित होते.