![उत्तरप्रदेश विधानसभा : यूपीत आज चौथ्या टप्प्यातील मतदान](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2Fup.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लखनौ, हरिओम द्विवेदी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यात अवध क्षेत्रातील 9 जिल्ह्यांतील 59 मतदारसंघात उद्या, बुधवारी (ता. 23) मतदान होणार आहे. या टप्प्यात ज्या जिल्ह्यात मतदान आहे तिथून मोदी सरकारचे चार मंत्री निवडून येतात. यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (लखनौ), महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती ईराणी (अमेठी), केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर (मलिहाबाद) आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी (लखीमपूर) यांचा समावेश आहे. या चार मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये मिळून विधानसभेच्या 21 जागा आहेत.
लखिमपूर खिरी हिंसाचाराचा प्रभाव गतवर्षी लखीमपूर खिरी येथे चार शेतकर्यांसह इतर आठ जणांच्या अंगावर गाडी घातली गेली होती. या घटनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. यात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. येथून मंत्री टेनी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने लखिमपूर खिरी जिल्ह्यातील सर्व 8 जागांवर विजय मिळवला होता.
बसपाचे मतदार सायलेंट निवडणूक मुख्यत्वेकरून भाजप विरुद्ध सपा अशी दिसत असली तरी चौथ्या टप्प्यात बसपा फॅक्टरला कमकुवत म्हणता येणार नाही. अवध प्रांतात बसपाची मोठी व्होट बँक आहे. 2017 मध्ये येथून बसपाला 8 जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना मिळालेल्या मतदानाचे प्रमाण 22 टक्क्यांहून अधिक आहे. यावेळी बसपाचे मतदार सायलेंट मानले जात आहेत.
9 जिल्ह्यांतील 59 जागा
2 कोटी 13 लाख मतदार
624 उमेदवार रिंगणात
चौथ्या टप्प्यात रायबरेली आणि अमेठी येथेही मतदान होत आहे. या जिल्ह्यांना काँग्रेसचा गड मानला जात होता; मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला. 2017 मध्ये रायबरेलीत जिंकलेल्या काँग्रेस आमदार आदिती सिंह आणि राकेश सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेच आता काँग्रेसचे प्रबळ विरोधात आहेत. अर्थात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा जीवतोड मेहनत करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रियांकांच्या रणनैतिक कौशल्याचीही परीक्षा या टप्प्यात होणार आहे. सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत.
हेही वाचलत का ?