लखीमपूर खिरी प्रकणारणाचे राजकारण त्याच व्यक्ती करत आहेत, जे काबूलमध्ये तालिबानींचे समर्थन करत होते. हे लोक हिंदू आणि शिखांना आपसात लढवू इच्छित आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
लखीमपूर खिरी येथे कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाहन घालून चिरडण्यात आले. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मुख्य संशयित आहे. गेल्या सहा दिवसांपासून याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. या प्रकरणावरून देशभरात संताप असताना आता मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आंदोलकांचा संबंध थेट तालिबान्यांच्या समर्थकांशी जोडला आहे.
योगी आदित्यनाथ गोरखपूरच्या दौऱ्यार असून दुसऱ्या दिवशी योगीराज बाबा गंभीरनाथ सभागृात त्यांनी भाषण केले. लखीमपूर प्रकरणाचे राजकारण करणाऱ्यांना आता तालिबानचा आरसा दाखविण्याची गरज आहे. देशात तेच लोक या प्रकरणाचे राजकारण करत आहेत जे काबूलमध्ये तालिबान्यांचे समर्थन करत होते.
ते पुढे म्हणाले, ओवेसींनी जर काश्मिर मध्ये बळी पडलेल्या हिंदू आणि शिखांप्रति साहानुभूती व्यक्त केली असती तर त्यांना मी नेता मानले असते. जे लोक लखीमपूर येथे हिंदू आणि शिखांना आपसात लढवू पाहत आहेत त्यांना काश्मिरचा आरसा दाखविण्याची गरज आहे.
माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, 'अखिलेश यादव यांना शिकण्यासाठी वेळ कुठे आहे. ते मोठ्या बापाचे पुत्र आहेत. स्वाभाविक त्यांचे आयुष्य आहे. त्यांची स्वत:ची कार्यपद्धतीन आहे. त्यांना लोकांचे काहीच पडले नाही. '
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने काय कारवाई केली, असा सवाल करत या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाने दिली. लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलग्याचा समावेश असल्याचा आरोप केला जात आहे.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात शेतकरी आंदोलकांवर घातलेली कार, त्यात आंदोलक आणि पत्रकारांच्या मृत्यूनंतर हिंसाचार उसळला. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने दखल घेत दोन याचिका दाखल करून घेतल्या व सुनावणी घेतली. या प्रकरणात किती जणांना अटक केली असे विचारत सरकारला नोटीस बजावली आहे.